पणजी, 9 फेब्रुवारी: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून भाजप (BJP) आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप केला. त्यानंतर आज सकाळी पुन्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच भाजप नेत्यांना इशाराही दिला. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राऊतांच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. गोव्यात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता त्यांनी त्यावर भाष्य करत प्रत्युत्तर दिलं आहे. सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाहीत. मी इतकं नक्कीच सांगू शकतो कि, मोदीजींच्या सरकारमध्ये कुणालाही व्हिक्टिमाईज कधीही केलं जात नाही. संजय राऊत हे एक व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. संजय राऊत हे एक संपादक आहेत आणि संपादकाला माहिती असतं कि, हेडलाईन कशी घ्यावी आणि दिवसभर आपलं नाव कसं चालेल… त्या प्रकारे ते वक्तव्य करत असतात. वाचा : ‘10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल’ चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण महाराष्ट्रात बहुमताने आम्ही सरकार स्थापन करु कोणतंही नवीन समीकरण नाही. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेने काम करेल आणि पूर्ण शक्तीने आम्ही आमच्या बहुमताने महाराष्ट्रात सरकार स्थापन करु असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. संजय राऊत रोज सकाळी येऊन केवळ मनोरंजन करतात ईडी काय करते हे हे ईडी सांगेल. ते का करत आहेत हे देखील ईडी सांगेल. मला असं वाटतं कि, संजय राऊत सध्या विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जे वक्तव्य आहे ते विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न आहे. रोज सकाळी 9 वाजता येऊन संजय राऊत मनोरंजन करतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या विधानाला महत्त्व दिलं नाही पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. वाचा : “आजचं पत्र हे केवळ माहितीसाठी; ट्रेलर अजून बाकी आहे, लवकरच सर्वांना बेनकाब करणार” "…तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही" संजय राऊतांचा इशारा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं. जे प्रमुख लोक आहेत त्यांचा गळा दाबायचा, त्यांना अडकवायचं, त्यांच्या विरोधात खोटे पुरावे निर्माण करायचे, त्यांना बदनाम करायचं. पण ते भ्रमात आहेत. आमच्या सारखे लोक या दडपशाहीला जुमानणार नाहीत असं संजय राऊत म्हणाले आहेत. यासोबतच भाजप नेत्यांना संजय राऊत यांनी थेट इशारा सुद्धा यावेळी दिला आहे. हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रचंड त्रास दिला जात आहे. रोज सकाळी एखादा माणूस उठतो आणि त्याच्यावर ईडी कारवाई करते. मी मागे सुद्धा बोललो कि, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही असं संजय राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.