जागा वाटपावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
नागपूर, 22 मे : सध्या महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या वाट्याला किती जागा येणार यावर चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून वीस जागांवर दावा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे. यावरून आता लहान भाऊ, मोठा भाऊ असा वादही रंगला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हटलं वडेट्टीवार यांनी? लहान भाऊ मोठा भाऊ या वादात आम्हाला पडायचं नाही. प्रथम तिन्ही भाऊ मिळून शेती चांगली करून, उत्तम नांगरणी करू, पीक चांगल येईल यासाठी प्रयत्न करू. शेतीचा हंगाम चांगला करण्यासाठी चांगलं काम करू, पीक आल्यावर कशी वाटणी कारयची ते ठरवू असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटलांवर प्रतिक्रिया दरम्यान जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आज जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. यावरून देखील वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. ईडीने कोणाला त्रास देऊ नये, अनेक नोटीस या राजकारणाने प्रेरित असतात. तपास यंत्रणा या केंद्राच्या दबावाखाली काम करतात असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांची आज ईडीकडून चौकशी; काय आहे नेमकं प्रकरण? आदित्य ठाकरेंच्या पोस्टरवर प्रतिक्रिया नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले आहेत. यावर देखील वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले असेल तरी ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी हा फॉर्म्युला आहे’ असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. समर्थकांना बॅनर लावण्याचा अधिकार आहे. आपला नेता मोठा व्हावा ही भावना असते त्यामुळे बॅनर लावतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.