साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 20 एप्रिल : प्रत्येक सणाला घरी गोड पदार्थ बनवले आणि खाल्ले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात श्रीखंड आणि आम्रखंड हा पदार्थ ताटातला मुख्य घटक असतो. सध्या हे पदार्थ शक्यतो विकतच आणले जातात. मात्र विकतच्या पदार्थांना घरची चव मिळत नाही. त्यामुळेच यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आज आपण आम्रखंड घरी कसं करावं हे पाहणार आहोत. कोल्हापूरच्या केतकी पाटील यांनी या पदार्थाची रेसिपी सांगितली आहे. कसं करणार आम्रखंड? उन्हाळा म्हंटला की आंबा आलाच. फळांचा राजा असलेल्या आंब्याची आवक बाजारात सुरू झाली की अनेकांना आम्रखंडाची आठवण येते. हे आम्रखंड 15 ते 20 मिनिटांमध्ये कसं तयार करावं याबाबत पाटील यांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला आम्रखंड नक्की बनवता येईल.
काय लागते साहित्य ? या आम्रखंडासाठी घरातच बनवलेला किंवा विकत आणलेला चक्का, पिठी साखर, आंब्याचा पल्प (शक्यतो हापूस आंबा), इलायची इतकेच साहित्य लागते. तयार आम्रखंडावर सजावटीसाठी काजू आणि बदाम आपल्याला हवे तसे वापरता येते. काय आहे कृती? • सर्वप्रथम चक्का बनवण्यासाठी : 1) पाणी न घातलेल्या दुधापासून बनवलेले घट्ट दही एका सुती पातळ कापडात बांधून घ्यावे. 2) ३-४ तासांसाठी त्याच्यावर एखादी वजनदार वस्तू ठेवून द्यावी. आपल्याला छान असा घट्ट मऊ चक्का मिळतो. घरी चक्का बनवण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे दुकानातून फक्त चक्का विकत आणून देखील मस्त आम्रखंड बनवू शकतो. • आम्रखंड बनवण्यासाठी : 1) एका मोठ्या बाउलमध्ये चक्का, बारीक केलेली साखर/ पिठीसाखर घालून फेटून घ्यावे. 2) चक्का आणि साखर एकजीव होईपर्यंत चांगले फेटून घ्यावे. 3) आंब्याचा गर काढून तो एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यावा. 4) थोडा पेस्ट सारखा झालेला आंब्याचा गर चक्का आणि साखरेच्या मिश्रणात घालावा. सर्व अगदी एकत्र चांगले फेटून घ्यावे. हे आपले आम्रखंड तयार आहे. 5) यामध्ये आता केशराचे दूध, इलायचीची बारीक केलेली पावडर, जायफळ पावडर आदी घटक आवड आणि उपलब्धते प्रमाणे घालून नीट मिसळून घ्यावे. 6) सजावटीसाठी वरून बारीक तुकडे करून काजू-बदाम टाकावेत. 7) खाण्याआधी हे तयार आम्रखंड साधारण 2 तास तरी फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावे. त्यामुळे याला थोडा घट्टपणा येतो. अगदी सोप्या पद्धतीनं घरीच बनवा चैत्रातील आंबेडाळ, पाहा Recipe Video या कृतीप्रमाणे आपण अगदी पटकन आम्रखंड बनवू शकतो. दरम्यान चक्क्यात साखर/पिठीसाखर मिसळताना आपल्या आवडीनुसार आणि आंब्याच्या गोडव्यावर ठरवावी, कारण साखर मिसळल्या नंतर हे आम्रखंड थोडे पातळ बनते. असे देखील केतकी पाटील यांनी सांगितले आहे. सणासुदीला अशाप्रकारे हे घरगुती चवीचे आणि झटपट होणाऱ्या आम्रखंड आपण घरच्या घरीच बनवू शकतो आणि घरच्या सदस्यांची वाहवाही नक्कीच मिळू शकतो.