पुणे, 02 मार्च : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. बालेकिल्यातच भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवावर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रतिक्रिया दिली.
कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं भाजपला धोबीपछाड दिली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंना पराभूत केलं. कसब्यातील पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण या पोटनिवडणुकीत भाजपनं मंत्री आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची मोठी फौज उतरवली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र एवढं करुनही भाजपला आपला पराभव रोखता आला नाही. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. याच मुद्यावर अधिवेशनात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपला टोला लगावला.
(कुटुंबाला उमेदवारी नाकारली म्हणून भाजपचा पराभव? कुणाल टिळक म्हणाले...)
'काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहे. त्यामुळे आमच्या आमदाराला आता विधानसभेत जागा करावी लागणार आहे, असा खोचक टोला नाना पटोले यांनी सभागृहात भाजपला लगावला होता. यावर लगेच फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
(कसब्यात विजय आणि चिंचवडमध्ये पराभव, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया)
तीन राज्यांच्या निवडणुका झाल्या आहे, पण काँग्रेस कुठेही दिसत नाही. कुठे तुमचा विजय झाला तर तुम्हाला उभं राहून सांगावं लागतं. आता थोडं आत्मचिंतन तुम्ही करा, थोडं आत्मचिंतन आम्ही करू, असं फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Mahavikas Aghadi, NCP, Pune, Pune Bypoll Election, Shiv sena