पुणे, 02 मार्च : पुण्यात कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लागली होती. अत्यंत चुरशीच्या या पोटनिवडणुकीत कसब पेठ या मतदार संघातून रविंद्र धंगेकर तर पिपरी चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे. दरम्यान यामध्ये कसबा पेठची पोटनिवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाल्याने राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या पोटनिवडणूकीत रविंद्र धंगेकरांचा विजय झाल्याने महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. या सगळ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
पवार म्हणाले की, रवींद्र धांगेकर यांना उमेदवारी देऊन आम्ही अर्धी लढाई जिंकली होती. तळागाळात काम करणारा कार्यकर्ता ते दौंड तालुक्यातील पण मागील 20 वर्ष पुण्यात राहिलेल्या रविंद्रला जनतेने पसंती दिली आहे. आम्ही सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो असल्याने याचे यश मिळाले आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, याचबरोबर अनेक मंत्री तिथे होते. सर्व गोष्टींचा वापर सत्ताधाऱ्यांनी तिथे केला. तेथील मतदारांनी सुद्धा सांगितले की तिथे काय परिस्थिती होती. पण जनतेने आम्हाला कौल दिला असल्याची प्रतिक्रीया पवार यांनी दिली.
याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आमचा विजय झाला असता. परंतु राहुल कलाटे याला मी सतत सांगितले पण त्यांनी ते ऐकले नाही. कारण त्याने माघार घेतली असती तर दोन्ही जागी आमचा विजय झाला असता. पण राहुल कलाटे व नाना काटे या दोघांची मते बघितली तर ती भाजप उमेदवारा पेक्षा जास्त आहेत. यातून एक सिद्ध होते जर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन व्यवस्थित रणनीती आखली विशेष करून कोण उमेदवार जनतेच्या पसंतीचा आहे. यावर लक्ष दिले तर आम्ही जनतेच्या मनात पोहचू. ज्या पद्धतीने हे शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे ते जनतेच्या पसंतीचे नाही हे सिद्ध होते. अशी प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली आहे.
चिंचवडमध्ये कलाटेंमुळे कलाटणी मिळाली
सत्ताधाऱ्यांनी कलाटे यांना मदत केल्यामुळेच आमचा पराभव झाला. मी कलाटे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं अनेकवेळा आवाहन केलं होतं. आता नानाला संधी देऊ असं मी त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही, असं अजित पवार म्हणाले.
कलाटे आणि नाना काटे यांची मते पाहिली तर ती मते भाजपच्या उमेदवारांपेक्षाही अधिक आहे. बंडखोरी झाली नसती तर चित्रं वेगळं दिसलं असतं. मागच्यावेळी कलाटेंना लाखभर मते मिळाली. पण यावेळी त्यांना ती मते मिळाली नाही. पण त्यांनी स्वत:ची मते घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कुटुंबाला उमेदवारी नाकारली म्हणून भाजपचा पराभव? कुणाल टिळक म्हणाले...
शिंदे-फडणवीस यांनी कसब्यात नेतृत्व केलं तरीही त्यांचा पराभव झाला. गिरीश बापट यांची तब्येत बरी नव्हती. नाकाला ऑक्सिजन असतानाही त्यांना प्रचारात आणलं. आरोग्यापेक्षा भाजपने निवडणूक महत्त्वाची समजली. ही माणुसकी आहे का? असा सवाल करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो केले. मोठ मोठ्या सभा घेतल्या तरीही भाजपचा पराभव झाला, असा चिमटाही त्यांनी काढला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elections, Pimpari chinchawad, Pune, Pune (City/Town/Village), Pune Bypoll Election