मुंबई,ता.20 जून : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज कृष्णकुंजवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेवून चर्चा केली. आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खास निरोप राज ठाकरेंना दिल्याची चर्चा आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालंय. महाराष्ट्रात महाआघाडीची चाचपणी करण्यासाठी पवारांनी आव्हाडांना कृष्णकुंजवर पाठवलं असा राजकीय निरिक्षकांचा अंदाज आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांची पुण्यात घेतलेली जाहीर मुलाखत चांगलीच गाजली होती. त्यानंतर दोन्ही नेते दोन-तीन वेळा एकत्र आले. त्यामुळं राज यांची शरद पवारांशी आणखी जवळीक निर्माण झाली. राज ठाकरे आता प्रत्येत भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करत असल्याने भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र येवू शकतात का याचा शरद पवार अंदाज घेत आहेत. मनसेला विधानसभा निवडणूकीत यश मिळालेलं नसलं तर तरूणांचा एक मोठा वर्ग हा राज ठाकरेंना मानणारा आहे. त्यामुळं यापुढच्या राजकारणात राज ठाकरे कुठली भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.