नागपूर, 16 एप्रिल : आज नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पहाता या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, मात्र ते नागपुरातील सभेला हजर राहणार आहेत. अजित पवारांच्या भाषणाकडं लक्ष दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे या सभेत बोलणार का? काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मविआची ही दुसरी वज्रमूठ सभा असून, ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक या सभेत राज्य सरकारची कोंडी करू शकतात. विशेष म्हणजे ही सभा भाजपच्या बालेकिल्ल्यात नागपूरमध्ये असल्यानं या सभेला महत्त्व प्राप्त झालं आहे.
संजय राऊतांकडून पहाणी दरम्यान मविआच्या या सभेच्या पार्श्वभूमीवर काल संजय राऊत यांनी नागपूरमध्ये जाऊन सभेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली. विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं तसंच यंत्रणाचा वापर करून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न असल्याचा देखील आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. मविआची ही सभा ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.