रत्नागिरी 23 जुलै : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपनं राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र यादरम्यान उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात म्हणजेच शिवसेनेतच वादाला सुरुवात झाली.
BREAKING : खरी शिवसेना कोणाची? आता निवडणूक आयोग करणार फैसला, दोन्ही गटांना महत्त्वाचे आदेश
बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांकडून वारंवार सडकून टीका केली जात आहे. अशात आता आणखी एक बातमी रत्नागिरीमधून समोर आली आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे चिपळूणमधील बॅनर दुसऱ्या गटाने रातोरात काढून टाकले आहेत. याच मुद्द्यावरुन शिवसेनेच्याच दोन गटात वाद चिघळण्याची शक्यता आहे.
महापुरात मदत केल्याबद्दल चिपळूण शहरासह प्रभागवार लावलेल्या आभार बॅनरवरून चिपळूणमध्ये दोन गटात राजकीय संघर्ष पेटला आहे. रात्री शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. संबंधित बॅनर हे शहराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी लावले होते. हे बॅनर उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी काढून टाकले. यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला आहे. आपण शिवसेनेत असून बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने विधानसभा-लोकसभेतील गटनेते ते प्रतोद आपलेच असल्याचा दावा केला आहे. या गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाणा निशाण्यावरही दावा केला आहे. दोन्ही बाजूने आपलीच सेना ही खरी शिवसेना आहे, असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची? याबाबतचा फैसला आता निवडणूक आयोगाच्या दारात होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shivsena