मुंबई, 28 जून : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवरून शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. तसेच एक जुलै रोजी मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, ज्याचं नेतृत्व आदित्य ठाकरे हे करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता या मोर्चापूर्वीच भाजपकडून ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर आणि मलबार हिल परिसरात बॅनर झळकले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे. या बॅनरवर भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांचं नाव आहे. बॅनरमध्ये काय म्हटलं? ‘ओळखा पाहून कोण? मुंबईची करून लुटमार कोणीतरी एक झालंय मालदार, मांडलाय मुंबईचा बाजार सत्तेबाहेर गेल्यामुळे झालाय आता बेजार!’ असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. या बॅनरवर भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांचं नाव आहे. या बॅनरवर कोणाचही नाव घेण्यात आलेलं नाही. मात्र या बॅनरचा रोख हा ठाकरे गटाकडे असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चालल्या आहेत. सरकारला जाब विचारणारं कोणीच नाही. मुंबईत विकास कामाच्या नावानं उधळपट्टी सुरू आहे. शिंदे सरकार बीएमसीमधील ठेवींची उधळपट्टी करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंकडून काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमधून करण्यात आला होता. तसेच त्यांनी एक जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचा देखील इशारा दिला आहे. मात्र मोर्चा आधीच आता भाजपकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.