देवेंद्र फडणवीस
मुंबई, 11 फेब्रुवारी : पत्रकार शशिकांत वारीशे यांचा मुंबई- गोवा महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून घतपात असल्याची शकां वर्तवण्यात येत आहे. हा मुद्दा विरोधकांनी देखील चांगलाच उचलून धरला आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी याच प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन पानी पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी या प्रकरणाची समांतर न्यायालयीन चौकशी व्हावी तसेच शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांना किमान 50 लाखांचे अर्थसहाय्य मिळावं अशी मागणी केली आहे. अजित पवार यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं होतं. यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पत्रकार वारीशे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. एसआयटी गठीत करण्याचे आदेश पत्रकार शशिकांत वारीशे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत करण्यात यावी असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही एसआटी गठीत करावी असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्यात येणार आहे. हेही वाचा : आता विरोधकांच्या हत्याच…; पत्रकार वारीशे प्रकरणात राऊतांचे फडणवीसांना खरमरीत पत्र, केली मोठी मागणी संजय राऊतांचे फडणवीसांना पत्र दरम्यान या प्रकरणात संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांसारखे ज्वलंत- निर्भीड पत्रकार ज्या कोकणच्या भूमीत जन्मास आले, त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणे धक्कादायक आहे. या प्रकरणाची समांतर न्यायालयीन चौकशी व्हावी तसेच शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांना किमान 50 लाखांचे अर्थसहाय्य मिळावं अशी मागणी राऊत यांनी या पत्राद्वारे केली आहे.