शरद पवारांच्या राजीनाम्यावर भाजपची खोचक प्रतिक्रिया
मुंबई, 7 मे : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यावरून त्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. शरद पवारांना अजित पवार यांना धडा शिकवायचा होता, त्यांना दाखवून द्यायचे होते की पक्ष माझाच आहे, म्हणून हा सर्व ड्रामा राष्ट्रवादीत घडल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांची नक्कीच वाताहत झाली असती म्हणून ते रडत होते. अजूनही पडद्यामागे त्यांची वाताहत सुरू असल्याचं वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे. उद्धव ठाकरेंना टोला दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील शनिवारी झालेल्या सभेवरून जोरदार टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंना सैनिकांची काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह समर्थ आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या आयुष्याचं मातेरं केलं. हिंदुत्वाच्या बाबतीत ते तीच ती कॅसेट लावत आहेत. ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेच्या लाचारीसाठी ते बसत आहेत, असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. निवडणुकांवर प्रतिक्रिया यावेळी बोलताना दरेकर यांनी निवडणुकांवरून देखील उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्या पौष्टिक आहाराची गरज आहे. मोठ्या संख्येनं आमदार, खासदार निघून गेले आहेत. कुस्ती करायची तर आधी सैन्य तरी जमवा. तुम्ही कुस्ती करायच्या आधीच चितपट झाला आहात. ते भाजपमुक्त करायचा दावा करत आहेत, मात्र खरी परिस्थिती वेगळीच असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.