नवी दिल्ली, 6 जुलै: तुम्ही प्रवासात असाल किंवा अन्य अत्यंत महत्वाच्या कामात असाल आणि तुम्हाला मोबाईलवर (Mobile) अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला तर नाईलाजाने तुम्ही तो घेता. त्यानंतर तो कॉल प्रमोशनल किंवा विनाकारण त्रास देणारा असेल तर अनेक जण वैतागतात. असे कॉल दिवसभरात बऱ्याचवेळा येतात. मात्र आता दूरसंचार विभाग (Department Of Telecom) असे विनाकारण कॉल्स (Calls), एसएमएस (SMS) करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, संबंधिताला दंड करण्याची तरतूद यात आहे.
नवे ग्राहक जोडण्यासह अन्य कारणांसाठी वारंवार विनाकारण कॉल्स किंवा एसएमएस करणाऱ्यांवर आता जरब बसवण्यात येणार असून, 50 पेक्षा जास्त असे कॉल्स किंवा एसएमएस केल्यास संबंधितांकडून त्यानंतरच्या प्रत्येक कॉल किंवा एसएमएसवर 10,000 रुपये दंड (penalty) वसूल करण्याचा प्रस्ताव दूरसंचार विभागानं तयार केला आहे. एका अधिकारी सूत्राने ही माहिती दिली आहे.
दूरसंचार विभाग अर्थात DOT ने दंडाचे स्तर कमी करत नियम अधिक कडक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार 0 ते 10 या दरम्यान कॉल्स किंवा एसएमएसबाबत उल्लंघन केल्यास 1,000 रुपये, 10 ते 50 वेळा उल्लंघन केल्यास 5000 रुपये आणि 50 पेक्षा अधिक वेळा उल्लंघन केल्यास 10,000 रुपये दंडाची तरतूद प्रस्तावित केली आहे.
फोनबाबत कर्मशिअल कम्युनिकेशन ग्राहक पसंती पुस्तिका 2018 (TCCCPR) नुसार दंडासाठी उल्लंघन स्तर 0 ते 100, 100 ते 1000 असा ठेवला आहे. या व्यतरिक्त दूरसंचार विभागाचा डिजीटल गुप्तचर विभाग (Digital Intelligence Department) देखील उपकरण पातळीवर उल्लंघनाची चौकशी करणार आहे. याबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी डिआययू संशयास्पद फोन क्रमांकावर सिस्टम जनरेटेड मेसेजही देखील पाठवणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा पडताळणीत काही संशयास्पद आढळल्यास सर्व क्रमांक डिस्कनेक्ट (Disconnect) केले जातील आणि त्यांच्याशी संबधित आयएमईआय संशयास्पद यादीत समाविष्ट केले जातील. संशयास्पद यादीतील आयएमईआयला 30 दिवसांच्या कालावधीसाठी कोणत्याही कॉल्स, एसएमएस किंवा डेटाला (इंटरनेट) परवानगी दिली जाणार नाही.
संशयास्पद यादीतील आयएमईआय (IMEI) क्रमाकांचा वापर करुन नव्या डिव्हाईस वापरुन त्रास देणाऱ्या कॉलरकडून वारंवार आलेला कोणत्याही प्रकारचा कॉल, एसएमएस किंवा डेटाची पुर्नतपासणी केली जाईल. यानंतरही त्रास देणाऱ्या कॉलरने डिव्हाईस बदलल्यास नव्या डिव्हाईसच्या आयएमईआय (IMEI) क्रमांकाची सिस्टमद्वारे पुर्नतपासणी होत नाहीत तोपर्यंत तो क्रमांक संशयास्पद यादीमध्ये ठेवला जाईल.
पुन्हा केलेल्या पडताळणीनंतर वारंवार त्रास देणाऱ्या कॉलरचा क्रमांक सक्रिय झाला आणि त्याने पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्याचं आढळल्यास, त्याच्या नवीन कनेक्शनचा वापर 6 महिन्यांकरता दररोज 20 कॉल्स आणि 20 एसएमएसपुरताच मर्यादित ठेवण्यात येईल.
यानंतरही उल्लंघन होत राहिल्यास दूरध्वनी कनेक्शन खरेदी करण्यासाठी वापरलेल्या ओळख आणि पत्ता यांचे पुरावे 2 वर्षांच्या कालावधीसाठी रोखले जातील, असं सूत्रांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SMS, Tech news, Telecom companies, Telecom service