रांची, 20 नोव्हेंबर: टीम इंडियानं शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 7 विकेट्सनं पराभव केला. भारतीय क्रिकेट टीमनं या विजयाबरोबरच 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी कोलकातामध्ये होणार आहे. या सामन्याच्या निकालाचा मालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे टीम इंडिया शेवटच्या मॅचमध्ये प्लेईंग 11 मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार का? याबबत चर्चा सुरू झाली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन मॅचमध्ये दोन जणांना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यानं टीम इंडियात अनेक नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. आयपीएल स्पर्धा गाजवणारे आवेश खान (Avesh Khan) आणि ऋतुराज गायकवाड (Rururaj Gaikwad) यांना या मालिकेत अद्याप संधी मिळालेली नाही. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) मॅचनंतर बेंच स्ट्रेंथबद्दल सांगितलं की,’ खेळाडूंना मैदानात वेळ मिळणं आवश्यक आहे. जे खेळाडू सध्या खेळत आहेत त्यांच्यावरही आमचं लक्ष आहे. कारण, त्यांनी अद्याप जास्त मॅच खेळलेल्या नाहीत. टीम इंडियासाठी काय बरोबर आहे ते पाहयला हवं. आम्ही तेच करणार. जे खेळाडू अद्याप खेळलेले नाहीत त्यांनाही संधी मिळणार आहे. कारण, अद्याप बऱ्याच टी20 इंटरनॅशनल मॅच बाकी आहेत.’ IND vs NZ: बॉलर्स मार खात असताना रोहितचं डोकं चाललं, टीम इंडियाला मिळाला टर्निंग पॉईंट तरूण खेळाडूंना खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे, यावर रोहितनं यावेळी भर दिला. हर्षल पटेलनं पदार्पणातील मॅचमध्येच ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला. त्याबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, ‘हर्षल अनेक वर्षांपासून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत आहे. त्याला काय करायचं हे चांगलं माहिती आहे. टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ चांगली आहे. त्यामुळे मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंवरही दबाव कायम राहतो,’ असं रोहितनं यावेळी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.