पुणे,12 फेब्रुवारी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांना विमान प्रवास नाकारल्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद पेटला आहे. ‘राज्यपाल ही एक व्यक्ती नाही तर त्या पदावर एक व्यक्ती येते आणि जाते. राज्याच्या इतिहासात इतका अहंकार असलेले सरकार यापूर्वी कोणी पाहिले नाही, हा सरकारचा पोरखेळ असून ही वागणूक निषेधार्थ आहे’ अशा शब्दांत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विमान प्रवास नाकारण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘हा प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री आणि मंत्री यांची ते नेमणूक करतात. राज्यपाल यांना कुठे जायचे असेल तर त्यांना राज्याचे सामान्य प्रशासन विभागाला सांगावे लागते आणि तसे ते आदेश काढतात. या प्रकाराबाबत मी माहिती घेतली असून त्यांनी कालच सामान्य प्रशासन विभागाला दौऱ्या बाबत कळवले आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने फाईल तयार करून मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आली, असे असताना राज्यपाल विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांना विमानातून उतरवणे योग्य नाही. ही बाब अत्यंत चुकीची असून आपण कोणत्या पदाचा अपमान करत आहे? असा सवाल फडणवीस यांनी विचारला. तसंच, ‘राज्यपाल ही एक व्यक्ती नाही तर त्या पदावर एक व्यक्ती येते आणि जाते. राज्याच्या इतिहासात इतका अहंकार असलेले सरकार यापूर्वी कोणी पाहिले नाही त्यांना इतका अहंकार कशाचा आहे. मला वाटते हा सरकारचा पोरखेळ असून ही वागणूक निषेधार्थ आहे’ अशी टीकाही फडणवीस यांनी केली. राज्यपालांना विमानातून का उतरावे लागले? आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. राज्य सरकारच्या विमानात राज्यपाल विराजमान सुद्धा झाले. पण, विमानाला उड्डाण करण्यास मंत्रालयाकडून परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यपाल विमानातून खाली उतरले आणि प्रवासी विमानाने नियोजित दौऱ्यासाठी उत्तराखंडला रवाना झाले. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून बुधवारी रात्री उशीरापर्यंत राज्यपाल कोश्यारी यांना उत्तराखंड इथं जाणाऱ्या विमानाला उड्डाण करण्यास परवानगी दिली गेली नव्हती. त्यानंतर सकाळी ही राजभवनाकडून यासंदर्भात चौकशी करूनच राज्यपाल यांनी विमानतळाकडे जाणे अपेक्षित होते. पण झाले उलटेच. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासनाच्या विमान परवानगी देणाऱ्या विभागाकडे राज्यपालांसाठी विमान प्रवासासाठी परवानगीची मागणी झाली. त्यानंतर रितसर परवानगी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्र पाठवले पण परवानगी देण्यात आली नाही. राजभवन कार्यालयाने सुद्धा यासंदर्भात माहिती जाणून घेणे अपेक्षित आहे. पण याबद्दल कोणतीही विचारपुस करण्यात आली नाही. राज्यपाल सकाळी थेट राजभवनातून निघाले आणि विमानतळावर पोहोचले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध करून दिले जात असते. पण आधीच मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी दिली गेली नसल्याने राज्यपालांना विमान उपलब्ध नव्हते दिले गेले नाही, अशी माहिती वरिष्ठ आयएएस अधिकारी यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.