जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'देशभक्ती म्हणजे सडकछाप धर्मांधतेचे ओंगळवाणे..'; आता बंडखोर आमदारांना शिवसेनेचा सल्ला

'देशभक्ती म्हणजे सडकछाप धर्मांधतेचे ओंगळवाणे..'; आता बंडखोर आमदारांना शिवसेनेचा सल्ला

'देशभक्ती म्हणजे सडकछाप धर्मांधतेचे ओंगळवाणे..'; आता बंडखोर आमदारांना शिवसेनेचा सल्ला

‘पैगंबर साहेबांच्याबाबत अपशब्द उच्चारल्यावर भारतीय जनता पक्षालाही नुपूर शर्मांपासून हात झटकावे लागले. तिला पक्षातून काढावे लागले. येथे भाजपने हिंदुत्व धोक्यात आल्याची आरोळी ठोकली नाही’

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 08 जुलै : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी केली आहे. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार (New Government in Maharashtra) सत्तेत आलं. मात्र, आपण आजही शिवसेनेतच असल्याचं बंडखोर आमदार (Rebel MLA) म्हणत आहेत. सन्मानाने मातोश्रीचे दरवाजे उघडल्यास परत येऊ, असंही आमदारांनी म्हटलं. यावर आता सामनाच्या अग्रलेखातून सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. अग्रलेखात काय लिहिलंय- शिवसेनेत जे काही कथित बंड झाले त्याची पेरणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतानाच झाली होती, असा गौप्यस्फोट त्यांच्यातल्याच एकाने केला. भारतीय जनता पक्ष सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सरकार पाडायचेच या ईर्षेने कसा कामास लागला होता तेच या आमदारांच्या वक्तव्याने स्पष्ट होते. ‘‘आम्ही तडफडायचो, ज्यांच्या विरोधात लढलो तीच माणसे आपल्यासोबत सत्तेत. आपली कामे कशी होणार?’’ असा प्रश्न या आमदाराने विचारला. 2014 साली भाजप-शिवसेना वेगळे लढले. ज्या भाजपविरोधात शिवसेना लढली त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे सत्तेत बसले. तेव्हा हा क्रांतिकारी प्रश्न कुणाला का पडू नये की, ‘‘ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या बरोबर सत्तेत कसे बसायचे?’’ हिंदुत्वाचा मुद्दाही तेव्हा उपस्थित केला गेला नाही. भाजपने तेव्हा हिंदुत्व अजिबात पाळले नाही. तरीही ‘सुरत’फेम अनेक मंत्री नंतर त्या मंत्रिमंडळात सामील झाले. यापैकी आणखी एका सन्माननीय बंडखोर आमदाराने स्पष्ट केले, ‘‘मातोश्रीचे दरवाजे सन्मानाने उघडले तर आम्ही आनंदाने परत येऊ!’’ आता दरवाजे सन्मानाने उघडायचे म्हणजे नक्की कसे काय करायचे? ‘मातोश्री’ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळय़ांचाच सन्मान होतो. दरवाजे उघडेच असतात व दाराबाहेरील चपलांचे ढिगारे हेच ‘मातोश्री’चे वैभव आणि श्रीमंती आहे. अलीकडे तर पन्नास ‘मोठे खोके’ भरतील इतक्या चपलांचा ढिगारा मिनिटागणिक ‘मातोश्री’वर होत असतो. हे जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, ‘‘शिवसेना हे कुटुंब आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घरआहे. परत फिरा. घरी या!’’ यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय? एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे पुन्हा येणार एकत्र? पडद्यामागे नेमकं काय आहे सुरू? भारतीय जनता पक्षाच्या फडणवीस सरकारात असताना आजच्या मुख्यमंत्र्यांनी ‘शिवसैनिकांवर अत्याचार होत आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांना मान-सन्मान मिळत नाही. निधीवाटपात वाटा नाही,’ असा जाहीर त्रागा करून मंत्रीपदाचा राजीनामाच दिला होता. तेव्हा भाजपला जी दूषणे दिली तीच आता इतरांना दिली जात आहेत. मुळात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले ते महाराष्ट्र व जनतेच्या कल्याणावर आधारित किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर. गेल्या अडीच वर्षांत हिंदुत्वाशी शिवसेनेने किंवा नेत्यांनी तडजोड केल्याचे एकतरी उदाहरण दाखवावे. ‘हिंदुत्व’ म्हणजे धर्मांधता किंवा दंगलींचा माहोल निर्माण करून निवडणुका जिंकायच्या असे नसते बाबांनो! पैगंबर साहेबांच्याबाबत अपशब्द उच्चारल्यावर भारतीय जनता पक्षालाही नुपूर शर्मांपासून हात झटकावे लागले. तिला पक्षातून काढावे लागले. येथे भाजपने हिंदुत्व धोक्यात आल्याची आरोळी ठोकली नाही. राज्य हे अशाच समन्वयाने चालवायचे असते. तिकडे प. बंगालात ‘सेक्युलर’ ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याच खासदार महुआ मोईत्रांवर कारवाई केली. का? तर महुआ यांनी कालीमातेवर एक टिप्पणी केल्याने हिंदूंच्या भावना भडकल्याची बोंब भाजपने मारली. ममतांनी श्रीमती मोईत्रांवर कारवाई केली. या कारवाईमुळेही तृणमूल काँग्रेसचा ‘सेक्युलर’वाद धोक्यात आला नाही. ‘त्यांच्यामागे भिकाऱ्यासारखा फिरलो, किती दिवस सहन करायचं? मरायचं का मग?’ जळगावच्या आमदारांचा धक्कादायक Audio Clip देशभक्ती म्हणजे सडकछाप धर्मांधतेचे ओंगळवाणे प्रदर्शन नाही. सगळय़ांना सांभाळून राज्य व देश पुढे न्यायचा असतो व आघाडीचे सरकार चालवताना कसरती कराव्या लागतात. अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’चे सरकार असताना राममंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम यांसारखे हिंदुत्वाचे विषय काही काळ गुंडाळून ठेवावे लागले होते, पण मोदींचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येताच राममंदिर, 370 कलमाचे विषय मार्गी लागले. आपल्याला आपल्या मतांप्रमाणे राज्य चालवायचे असेल व निर्णय अमलात आणायचे असतील तर स्वतःचे बहुमताचे सरकार निवडून आणणे हाच एकमेव पर्याय ठरतो. स्वतःस बंडखोर म्हणवून घेणाऱया आमदारांनी कधी या पर्यायाचा विचार केला आहे काय? ‘‘चला साहेब, आता पुरे झाले. हे महाविकास आघाडीचे सरकार थांबवा. आपण बाहेर पडू व स्वबळावर हिंदुत्वाचे सरकार आणू. तोपर्यंत वाटल्यास विरोधी पक्षात बसू!’’ अशी भूमिका या तथाकथित हिंदुत्ववादी बंडखोर आमदारांनी घेतली असती तर त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकऱयांनी ‘व्वा रे माझ्या मर्दांनो!’ असे बोलून पाठच थोपटली असती. पण यापैकी काहीच घडले नाही. उलट सत्तेतून फक्त सत्तेकडे हाच मार्ग त्यांनी निवडला. इकडे त्यांना महाविकास आघाडीचा जाच होता तरी आता या गटास भाजपच्या तालावरच नाचायचे आहे. भाजपला शिवसेनेचा पराभव करायचा नसून शिवसेना संपवायची आहे व पाहुण्याच्या चपलेने विंचू मारायचा आहे. पण विंचवाचा डंख व विष जहाल असते. इंगळी डसली की काय होते ते डोंगर-झुडुपातले राजकारण करणाऱयांना समजते. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने उघडेच असतात व बाहेर चपलांचे ढिगारे वाढतच आहेत. या वैभवाशी कसा सामना करणार?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात