मुंबई 24 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना घटक पक्षाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलीय. या बैठकीचा अहवाल पत्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधान परीषद अध्यक्ष रमराजे निंबाळकर यांना पाठवलं आहे. शिवसेनेच्या या नव्या घटक पक्षाच्या अधिकृत पत्रावर शिवसेनेच्या 37 आमदारांच्या सह्या आहेत.
दरम्यान शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटरहेडवर काढण्यात आलेल्या पत्रात एकनाथ शिंदे यांनी आपल्या नाराजीचं कारणही सांगितलं आहे.
शिवसेनेला झटका, एकनाथ शिंदे गटनेता, भरत गोगावले प्रतोद, 37 बंडखोर आमदारांच्या सह्याएकनाथ शिंदे यांनी पत्रात काय म्हटलं आहे?
भारतीय जनता पक्षासोबत 2019 च्या निवडणुका लढवल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आघाडी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याचं शिवसेना आमदारांना अजिबात पटलेलं नव्हतं.
पोलीस भरती प्रकरणी राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख आणि दाऊदशी संबंध असल्याच्या आरोप आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर गुन्हे दाखल झाले. यावरून शिवसेनेवरही जनता नाराज झाली आणि टीका सोसावी लागली.
महाविकास आघाडीमुळे राजकीय दृष्ट्या शिवसेना नेत्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागलं. एवढंच नव्हे तर स्थानिक कार्यकर्त्यांचा रोषही वेळोवेळी ओढावून घ्यावा लागला.
शिवसेनेने आपल्या विचार, धोरणांच्या विपरीत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दबावामुळे मराठी माणसासाठी लढणाऱ्या शिवसेनेला अनेकदा आपल्या विचारांच्या विरोधात जाऊन भूमिका घ्यावी लागली.
गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीत सामील झाल्यामुळे अन्य घटक पक्षांचे विचार न पटूनही अनेकदा शिवसेना पक्षाने आणि पक्ष नेतृत्वाने आपली तत्त्वं बाजूला ठेवून निर्णय घेतले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आपली हिंदुत्वाचा विचार आणि तत्वांशी तडजोड न करता, पारदर्शी, प्रामाणिक आणि निष्कलंक सरकार असावे, अशी भूमिका होती. मात्र, महाविकास आघाडी स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून याला तिलांजली मिळाल्याचे दिसून आले.
राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेनेला डोळ्यासमोर ठेवून 2019 मध्ये मतदान केले होते. जनतेचे आशीर्वाद भाजप आणि शिवसेनेच्या युतीला होते. मात्र, याविरोधी भूमिका घेतल्याचा प्रचंड मोठा फटका पक्षाला बसला.
यासंदर्भात अनेकदा पक्षनेतृत्वाशी चर्चा केली. यातून बाहेर पडण्याचा आग्रह धरला. अक्षरशः डोळ्यात पाणी आणून विनवण्या केला. मात्र, पक्षातील नेते, पदाधिकारी यांच्या भावनांना जाणीवपूर्वक बगल देण्यात आली.
गेल्या अडीच वर्षापासून घडत असलेल्या अनेक गोष्टींमुळे स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारांचा पक्षावर दबाव निर्माण झाला आहे. आमदारांना अनेक समस्या, त्रासांना सामोरे जावे लागत आहे. आजही महाविकास आघाडी स्थापन केल्याबद्दल प्रश्नांचा भडिमार नेत्यांवर केला जात आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व, विचार घेऊन आता आम्ही पुढे जाण्याचे ठरवले आहे. काही भ्रष्टाचारी नेत्यांमुळे शिवसेनेलाही टीकचे धनी केले जात आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या पत्रावर ३२ आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. मात्र, तो प्रस्ताव दुरुस्त करून नव्याने तयार करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.