मुंबई, 8 फेब्रुवारी : "उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. ते दिल्लीवरून कबूल करून आले होते की मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, पण त्यांनी तस केलं नाही", असा धक्कादायक खुलासा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. खरी शिवसेना कोणाची या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टात केसेस सुरू आहेत. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी सुप्रीम कोर्टात किंवा निवडणूक आयोगात सांगावं. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हे सुरू आहे, असा आरोपही यावेळी दीपक केसरकर यांनी केला. मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
काय म्हणाले दीपक केसरकर?
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं यावर सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टासमोर सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचं म्हणणं त्यांच्यासमोर मांडावे. मात्र, ते न करता. ठाकरे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना काय वाटत हे महत्त्वाचं नाही. सुप्रीम कोर्टाने असे कोणतेही आदेश दिले नाहीत. सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोग उद्धव ठाकरे याचं म्हणणं ऐकेल का? त्यांची सुरू असलेली ही सगळी धडपड व्यर्थ आहे. अस बोलून लोकांची सहानुभुती मिळवणं गैर आहे. लोकांना खर काय ते सांगायला हवं. प्रत्यक्ष साक्षीदार असलेले आम्ही लोक आहोत. भाजपसोबत बोलणी सुरू होती. असे असतानाही मूळ युती तोडून तुम्ही दुसऱ्यासोबत गेले, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी आमचं ऐकलं नाही : दीपक केसरकर
मी काय कोणी मोठा मनुष्य नाही. पण मी ते घडवून आणलं होतं. पक्षाच हित म्हणून मी ते केलं. पंतप्रधानांशी भेट घडवून आणली. त्यावेळी बोलणी केली आणि ती चूक दुरुस्त करायची संधी होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, असा खुलासाच दीपक केसरकर यांनी केला. पुढे ते म्हणाले, की कुटुंबावर जे काही आरोप झाले त्याने ते दुखावले गेले असतील. पण दुखावले गेले म्हणून अस वागणं चुकीचं होतं. ठरलेल्या गोष्टी उद्धव ठाकरे यांनी केल्या नाहीत. त्याप्रमाणे भूमिका घेतली नाही. मी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे, जे ऑन रेकॉर्ड आहे. आजसुद्धा तुम्ही सांगा की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा आम्ही सगळे मुंबईला येऊ असं मी त्यावेळी सांगितलं होतं.
वाचा - आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक प्रकरणाला नवे वळण, औरंगाबाद पोलिसांचा धक्कादायक खुलासा
शिवसेना कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही : केसरकर
पंतप्रधान आणि बाळासाहेब यांच्यात एक वेगळं बॉंडिंग होतं. नरेंद्र मोदी एवढ्या मोठ्या पदावर गेले पण त्यांनी ती आपुलकी सोडली नाही. मग तुम्ही बाळासाहेबांचे विचार कसे काय विसरले? पक्ष ही कधीही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नसते. बाळासाहेब होते त्यावेळी कधीही निवडणूक होत न्हवती. पक्ष हा कुठल्यातरी कुटुंबाची खाजगी प्रॉपर्टी आहे, असं त्यांनी निवडणूक आयोगाकडे लिहून द्यावं. आपल्या घराला लागलेली आग आधी विझवायला लागते. आमच्या घराला आग लागलीय ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी विझवणार नाही. आम्हीच विझवणार आहोत.
लोकांना खरं ते सांगा : दीपक केसरकर
मुख्यमंत्री तुम्हीच रहा पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा अस म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंची पण तुम्ही दखल घेतली नाहीत. उद्धव ठाकरे दिल्लीवरून कबूल करून आले होते की मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो पण त्यांनी तस केलं नाही. मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो, मला काय गरज होती. मी बाळासाहेबांसाठी स्वतः आलो होतो. मला तेव्हा अनेक ऑफर होत्या मी दुसरीकडे गेलो नाही. मला तेव्हा इकडे आल्यावर मंत्रिपद दिलं नाही. मला फक्त त्यावेळी बोलले असते की माझ्या काही अडचणी आहेत मी मंत्रिपद देऊ शकत नाही तरी चालल असतं. मी कोकणातली महत्वाची जबाबदारी सोडून शिवसेनेत आलो होतो. मी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी शिर्डीला पहिली चादर चढवली होती. किती वेळा आम्हाला गद्दार म्हणता, अर्धसत्य का मांडता, लोकांना खोटं का सांगता, असा प्रश्न दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena, Uddhav tahckeray