मुंबई, 16 ऑक्टोबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी मुख्यमंत्रिपदाच्या निवडीचा घटनाक्रम सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी लगेच ट्वीट करून 'तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा?' असा टोला लगावला आहे.
'जर भाजपने आपलं वचन मोडलं नसतं तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. पण, त्यांनी वचन मोडलं आणि त्यामुळे पूत्र कर्तव्य म्हणून मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारावी लागली', असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाच्या निवडीचा घटनाक्रमच सांगून फडणवीस यांना फटकारले होते.
तर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून थेट महाभारताचा दाखल देत पवारांना उत्तर दिले आहे.
द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2021
'द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!' असं म्हणत फडणवीसांनी पवारांवर पलटवार केला आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
'महाविकास आघाडीचे सरकार झाले, तेव्हा हे सरकार बनवण्यासाठी तिन्ही पक्षांचा हात होता. माझाही त्यात सहभाग होता. त्यावेळी आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी नेतृत्व कुणी करायचं तीन चार नाव समोर आली. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांचा हात धरून उंचावला आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे मी सांगितलं. पण, त्यावेळी उद्धव ठाकरे यांची हात उंचावण्याची तयारी नव्हती. त्यांची मुख्यमंत्री होण्याची तयारी नव्हती. त्यांना सक्तीने हातवर करावा लागला' असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.
तुमची मुलं डिप्रेशनमध्ये आहेत का? त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जावं का? वाचा
'या लोकांना मी वयाच्या ३ -४ वर्षांपासून पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझे वैयक्तिगत मतभेद होते. पण त्यांच्या सारखा दिलदार माणूस नव्हता. त्यांनी महाराष्ट्रासाठी जे योगदान दिले आहे ते विसरता कामा नये. त्यांच्या पक्षाने जे काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या अर्थात त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा माझा आग्रह होता. माझा आग्रह असल्यामुळे सर्वांनी स्वागत केलं आणि त्याची निवड झाली. सर्व आमदारांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. पण, माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे, उगाच कुठल्याही गोष्टींवर आक्षेप घेऊ नये, तुम्हाला जर यातील काही माहिती असेल तर बोला, पण तुम्ही सेनेसोबत पाच वर्ष काम केले आहे. त्यामुळे तुम्हाला कामाचा अनुभव आहे. त्यामुळे असं आरोप करू नये' असा सल्लावजा टोलाही फडणवीसांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uddhav Thackery, शरद पवार