पुणे, 10 जून : महाराष्ट्रात उद्याच (11जून) मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीत सर्वप्रथम मान्सूनचं आगमन होईल. गेले दोन दिवस तळकोकणात आणि गोव्यात हलक्या सरी कोसळत आहेत. दक्षिणेच्या किनारपट्टी भागात मान्सून उद्याच दाखल होणार आहे. असंच वेगवान मार्गक्रमण राहिलं तर शुक्रवारपर्यंत मान्सूनचा पाऊस पुण्यात पोहोचेल आणि आठवड्याच्या शेवटी मुंबईत दाखल होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
पुढच्या एक दोन दिवसात पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल. संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनच्या वाऱ्यांना आणखी दोन दिवस लागतील. सध्या अरबी समुद्राकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे गोवा, तळकोकणात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी साधारण 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल, असंही कश्यपी यांनी म्हटलं आहे.
पुढच्या 48 तासांचा अंदाज
येत्या 48 तासांत नैऋत्य मौसमी मान्सूनचं महाराष्ट्रात दणक्यात आगमन होईल, असा अंदाज पुणे वेशशाळेनं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पहिल्यात टप्प्यात जोरदार पाऊस पडेल, असंही पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं. कोकणात 11 तारखेला पुण्यात 12 तारखेला तर मुंबईत 13 तारखेला मान्सूनचा जोरदार पाऊस पडेल, असा अंदाजही पुणे वेधशाळेवं वर्तवला आहे. मान्सूनच्या पहिल्या आठवड्यात प्रामुख्याने बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वारे विदर्भ मराठवाड्यात चांगला पाऊस पाडतील असंही हवामान खात्यानं म्हटलंय.
निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचाल मंदावली होती. ती पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. केरळमध्ये वेळेवर पोहोचलेला मान्सून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे कर्नाटकमध्येच अडला होता. आता मान्सूनच्या आगमनासाठी पूरक वातावरण निर्माण झालं आहे, असं हवामान तज्ज्ञ सांगतात. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे.
अशी असेल मान्सूनची वाटचाल
1 जून केरळमध्ये आगमन
4 जून कर्नाटकात दाखल, पण चक्रीवादळाने पुढचा प्रवास थांबला
येत्या 48 तासात राज्यात मान्सूनचं आगमन
पुण्यात 12 तारखेपासून मान्सूनचा पाऊस
मुंबईत 13 तारखेपासून मान्सूनचा पाऊस
15 तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
अन्य बातम्या
कोरोनाच्या संकटात जगातील 'हे' 10 देश सर्वाधिक सुरक्षित; पाहा भारत कितव्या स्थानी
मुंबई लोकल सुरू करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केली मागणी
आरोग्य विभागाचा मोठा खुलासा, स्थलांतरित मजुरांमुळे 72% वाढले कोरोनाबाधित रुग्ण