लक्ष्मण घाटोळ (प्रतिनिधी),
नाशिक, 23 जुलै: भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलेलं हे फक्त शिवप्रेमींच्या आणि शिवभक्तांच्या भावना दुखावणारं असल्याने राज्यभरातून या विधानाचा निषेध केला जात आहे. व्यकंय्या नायडू यांच्या विधानामुळे राज्यभरातील पडसाद उमटताना दिसत आहेत.
हेही वाचा...शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही? संजय राऊतांचा सवाल
नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यंकय्या नायडू यांना जय भवानी जय शिवाजी अशा आशयाचे पत्र पाठवत या घटनेचा निषेध केला. तसेच नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करत व्यंकय्या नायडू यांचं पोस्टर जाळलं. तर पुण्यातही संभाजी ब्रिगेडनं आंदोलन सुरू केलं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेतील शपथविधी नंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जे वक्तव्य केलं हे माझं चेंबर आहे, कुणाचं घर नाही. या विधानावरून राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे.
संजय राऊत यांची सणसणीत टीका...
त्यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपवर सणसणीत टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? असा सवाल करत भाजपचे या विषयांवर 'तोंड बंद' आंदोलन सुरू झालं आहे. तर दुसरीकडे संभाजी भिडे यांच्याकडून सांगली आणि सातारा जिल्हा बंदची घोषणा अद्याप झालेली नाही..., असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि समर्थकांना जाब विचारला आहे.
काय आहे संजय राऊत यांचं ट्वीट?
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही...
जय भवानी!
जय शिवाजी!!!!!!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2020
नेमकं काय झालं होतं राज्यसभेत...
राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये बुधवारी नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पाडला. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे मोजक्यात सदस्यांना शपथ देण्यात आली.
महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. विशेष म्हणजे रामदास आठवले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी...जय शिवाजी' असा जयघोष करत शपथ पूर्ण केली होती.
हेही वाचा...धक्कादायक! कारमध्ये तरुणीवर अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर सोडलं
उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप नोंदवला. 'हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही आहे, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी', अशी सूचनाही व्यंकय्या नायडू यांनी केली होती.