सोलापूर, 1 जून : पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरून मविआमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. असाच वाद आता शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी आतापासूनच या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला सुटणार हे अद्याप ठरलेलं नाहीये. असं असतानाही राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र दुसरीकडे लांडे यांनी देखील याच मतदारसंघासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांकडून अप्रत्यक्षरित्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून नेमकं कोण निवडणूक लढवणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे हे चांगले उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेत उत्तर कामगिरी केली आहे. त्यांनी बैलगाडा संदर्भात संसदेत केलेली भाषण गाजली आहेत. अमोल कोल्हे यांची संसदीय कार्यपद्धती उत्तम आहे. त्यांना अनेक प्रश्नांवर आवाज उठवल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. शिरूर लोकसभेवर राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा, कोल्हेंची जागा धोक्यात? पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. हा भाजप पुढील सध्याच्या काळातील मोठा प्रश्न आहे. आमचे राष्ट्रवादीतील अनेक सहकारी भाजपमध्ये गेले आहेत. त्यांना कुठे बसवायचे आणि निष्ठावंत भाजपाच्या नेत्यांना कुठे बसवायचे हा प्रश्न भाजपला पडला असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







