मुंबई, 25 जानेवारी : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीनंतर महाविकासआघाडीमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल, असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उद्धव ठाकरे यांना अल्टिमेटम दिला आहे.
'उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीबाबतचा महाविकासआघाडीसंदर्भातला निर्णय लवकर जाहीर करावा. आपण लवकर बसून ठरवू. उद्धव ठाकरे जेवढ्या लवकर निर्णय जाहीर करतील तेवढं चांगलं होईल,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एबीपी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.
'संघटितपणे काम करयाचं ही आमची भूमिका आहे. सगळ्यांना बरोबर घेणं हा आमचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. फक्त येणाऱ्यांचं लवकर ठरलं तर बरं होईल. अनेकजण ऐनवेळी आमचं यांचं पटलं नाही म्हणून आम्ही स्वतंत्र उभे राहिलो हे दाखवतात. त्यातून बरीच मतं बाजूला काढण्याचं काम होतं, ज्यामुळे भाजपचा फायदा होतो', अशी भीतीही जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.
शिंदेंनंतर मित्रांनीच ठाकरेंना खिंडीत गाठलं! पवार-आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?
देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या शपथविधीबाबतही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादी राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्याअनुशंगाने शरद पवारांची ती खेळी असू शकते. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचेच आमदार सोडून गेले. राष्ट्रवादीने शेवटपर्यंत शिवेसनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jayant patil, NCP, Prakash ambedkar, Shivsena, Uddhav Thackeray