पंढरपूर, 25 नोव्हेंबर: विठ्ठल मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून वीणेकरी म्हणून पहारा देणारे कवडुजी नारायण भोयर (वय- 64 ) व त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयर (वय-55) या दाम्पत्याला कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान मिळाला आहे.
उद्या, गुरुवारी पहाटे कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचेवेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून भोयर दाम्पत्य उपस्थित राहणार आहे.
हेही वाचा...राज ठाकरेही हळहळले, अहमद पटेलांचा सत्तेच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच!
विठ्ठल मंदिरातील एकूण सहा वीणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून ही निवड आज करण्यात आली. भोयर दाम्पत्य हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होणार आहे.
यंदा कार्तिकी यात्रेवेळी देखील वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश नसल्याने आषाढी एकदाशीप्रमाणेच मंदिरातील वीणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून कवडुजी भोयर यांची निवड करण्यात आली. कवडुजी भोयर हे मूळचे डौलापूर (पो.मोझरी, शेकापूर तालुका हिंगणघाट, जि. वर्धा) येथील रहिवासी असून गेल्या 10 वर्षांपासून पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ते वीणेकरी म्हणून पहारा देत आहेत. ते स्वतः आणि त्यांचं कुटुंबीय माळकरी आहेत. मागील आठ महिन्यांपासून लॉकडाऊनच्या काळात देखील ते मंदिरात पूर्णवेळ सेवा करीत आहेत.
पंढरपूरात नाकाबंदी!
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाची कार्तिकी एकादशीची यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराची नाकाबंदी करण्यात आली आहे.
हेही वाचा..विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याच्या शेंडीवर न्हाव्यानं फिरवली कात्री, नंतर झालं असं...
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये चारही बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या 9 गावामध्ये ही नाकाबंदी असणार आहे. कार्तिकी यात्रा गावोगावी साजरा करण्याचं सोलापूर जिल्हा प्रशासनाने आवाहन केलं आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा मानस आहे. अन्य जिल्ह्यातील भाविक, वारकरी पंढरपुरात येऊ नये यासाठी पंढपूर शहरात अठराशे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.