मुंबई, 02 नोव्हेंबर : मागच्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष पहायला मिळत आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत 40 आमदार फुटून भाजपसोबत युती केली. या दरम्यान महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. दरम्यान यावर काल (दि.01) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी 5 सदस्यांच्या समीतीने 29 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गटाने कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. यावर आता पुढील सुनावणी लांबल्याने पुन्हा राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरा झडण्याच्या शक्यता आहेत. यासगळ्या न्यायालयीन प्रक्रीयेवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात 29 नोव्हेंबरला सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान 29 नोव्हेंबरला अंतीम निकाल लागल्यास सर्वात पहिल्यांदा बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचे निलंबण होणार का? राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार येणार का? की राष्ट्रपती राजवट घोषित केली जाणार? या सगळ्या प्रश्नांवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर चर्चा केली.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला धक्का, मुंबईतल्या रस्ते काँक्रिटिकरणात आला मोठा 'खड्डा'!
ते म्हणाले की, 1985 साली 52 वी घटनादुरुस्ती करून पक्षांतर बंदी कायदा अंमलात आणला गेला. या पक्षातून त्या पक्षात जात राजकारणात मोठा घोडेबाजार रोखण्यासाठी हा कायदा आणला गेला होता. सत्ताधारी पक्षाचे आमदार फोडून घोडेबाजार करून सत्तेत येण्यासाठी केला जाणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी हा काय करण्यात आला होता.
आमदारांनी स्वत: पक्ष सोडला तर ते अपात्र ठरतात किंवा सभागृहात पक्षाच्या आदेशाच्या विरोधात मतदान केले, तरीही ते अपात्र होतात. म्हणजे महाराष्ट्रातील सत्तांतराचं प्रकरण पहिल्या गटात येत असल्याची माहिती बापट यांनी दिली.
पक्षांतर बंदी कायद्यानुसार सुरुवातीला बाहेर पडणारे 16 आमदार दोन-तृतीयांश आमदार नाहीत. पण त्यानंतर एक-एक करत अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी दोन तृतीयांशसाठी आवश्यक असणारा 37 चा मॅजिक आकडा गाठला. आता सर्वोच्च न्यायालयाला ठरवावं लागेल की, दोन तृतीयांश आमदार एकाच वेळी बाहेर पडायला हवेत की हळूहळू गेले तरी चालतील असे बापट म्हणाले.
पण घटना वाचल्यानंतर माझ्यामते, हे सर्व आमदार एकाच वेळी बाहेर पडायला हवेत. हे 16 आमदार दोन तृतीयांश आमदार नाहीत. तसेच ते इतर कोणत्याही पक्षात विलीन झाले नाहीत. त्यामुळे ते अपात्र ठरतील. या आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे, त्यामुळे पक्षांतर बदी कायद्यानुसार हे आमदार अपात्र ठरले, तर 91 व्या घटनादुरुस्तीनुसार, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री राहता येणार नाही.
अशावेळी ज्या नेत्याच्या पाठिशी बहुमत आहे, अशा नेत्याला मुख्यमंत्री पदासाठी राज्यपाल आमंत्रित करू शकतात. पण अशी शक्यता मला अजिबात दिसत नाही. असं झाल्यास 356 कलमाअंतर्गत राष्ट्रपती राजवट घोषीत केली जाऊ शकते.
हे ही वाचा : मी तुम्हाला सळो की पळो करुन सोडणार, सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटलांना इशारा
याबाबत दुसरी शक्यता अशी आहे की, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे 40आमदार अपात्र ठरवले, तर राज्यात बहुमताचा आकडा 120 वर येतो. यानंतर उरलेली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 120 सदस्य असतील, तर राज्यपालांना महाविकास आघाडीला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवावंच लागेल. त्यांनी मविआला न बोलवता राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली तर ही कृती पुन्हा घटनाबाह्य ठरते.
पण कुणाकडेच बहुमत नसेल तर राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात. ही राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांसाठी असते. या काळात निवडणुका घ्याव्या लागतात, अशी माहिती बापट यांनी दिली यामुळे 29 तारखेला होणाऱ्या फैसल्यावर राज्यातील सत्तानाट्यावर घडामोडी घडणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat, Maharashtra government, Maharashtra political news, Sharad Pawar, Uddhav Thackeray (Politician)