कोल्हापूर,12 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात एक भयानक घटना समोर आली आहे. जमीनीच्या वाटणीवरून सासऱ्याला मारण्यात आले आहे. मटणाच्या जेवणातून विषारी औषध घालून मारल्याचा प्राथमीक अंदाजानुसार माहिती समोर आली आहे. अत्यवस्थ झालेल्या आण्णाजी बापू जाधव (वय 72, रा. बाचणी, ता. कागल) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सून रूपाली दत्तात्रय जाधव हिच्यावर मटणाच्या जेवणात विषारी औषध घातल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
अण्णाजी जाधव यांची सून रुपाली ही सध्या फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. बाचणी येथील आण्णाजी जाधव यांना दत्तात्रय व नामदेव ही दोन मुले आहेत. अण्णाजी यांनी आपली मालमत्ता दोन्ही मुलांच्या नावे केली होती.
हे ही वाचा : एका गुन्ह्याची उकल करण्यासाठी बिहारमधून पुण्यात आलेली महिला पोलीस; हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या
दत्तात्रय याचा 12 वर्षापूर्वी कावणे येथील रुपाली हिच्याशी विवाह झाला. त्यांना ‘मुलगा व मुलगी अशी दोन अपत्य आहेत. एक वर्षापूर्वी दत्तात्रय याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर रुपाली सर्व मालमत्ता विकणार असल्याची कुणकुण आण्णाजी यांना लागली. त्यामुळे त्यांनी स्वतःच केलेला दस्त रद्द करून आपल्या संपत्तीत मुलींचीही नावे लावण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे रुपाली अस्वस्थ होती.
26 जुलै रोजी तिने सासरे आण्णाजी व दीर नामदेव यांना मटण बनवून दिले. ते खाल्ल्यानंतर काही वेळातच आण्णाजी यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्रथम शासकीय व नंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी (दि. 10) सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
सुनेचा शोध सुरू
कावणे (ता. करवीर) येथील माहेरी राहणाऱ्या सून रुपालीला अटक करण्यासाठी पोलिस गेले असता घरातील आई, वडील, भावासह ती फरार झाल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा : जालन्यातील ‘त्या’ कंपनीत नेमकं काय बनवलं जातं, जिथून जप्त झाली 390 कोटींची संपत्ती? वाचा Inside Story
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रक्षाविसर्जन
दरम्यान, बाचणी ग्रामस्थांनी रुपालीला अटक केल्याशिवाय आण्णाजी जाधव यांची रक्षा विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला. कागल पोलिस निरिक्षक अजितकुमार जाधव, पीएसआय ए. वाय. खडके यांनी बाचणीला भेट देऊन जाधव यांचा शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी रक्षा विसर्जित केली. दरम्यान, नातेवाईकांनी रुपालीला अटक करुन कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, कागल तहसिलदार व पोलिस निरिक्षक यांना निवेदन दिले.