मुंबई, 16 मार्च : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) हे मागील काही दिवसांपासून सातत्याने ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze Case) अद्याप ताजं असतानाच पुन्हा एकदा फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एका प्रकरणावरून आक्रमक सवाल केला आहे.
पुण्यातील एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी (Sharjeel Usmani speech) याच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. 'महाविकास आघाडी सरकार शरजील उस्मानी याला जामीन मिळवण्यासाठी मदत करत आहे. अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचवणार मा. उद्धवजी,' असा प्रश्न फेसबुक पोस्टद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
नक्की काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’. प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले? मूळ तक्रारीत भादंविचे 295 अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम 153 अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते. खरंतर एफआयआर 295 अ, 153 अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - BREAKING : राज्य सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत, पोलिसात तक्रार दाखल
‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्राविरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत. अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी?' असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Sachin, Shivsena, Uddhav Thackeray (Politician)