मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पुन्हा एकदा ऐतिहासिक असा विजय मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची मात्र पिछेहाट झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गुजरातमध्ये भाजप तब्बल 157 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 16 आणि आप 5 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. गेले 27 वर्ष गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीतही मतदारांनी पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवला आहे. गुजरामध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचा देशभरातील भाजप नेत्यांकडून जल्लोष सुरू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'तेव्हाच चित्र स्पष्ट झालं'
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व असा विजय प्राप्त झाला आहे. या विजयाने आजवरचे रेकॉर्ड मोडले. 27 वर्ष राज्य करूनही जो विश्वास मतदारांनी दाखवला, त्यावरून हेच स्पष्ट होतं की लोकांना वाटतं फक्त मोदीच विकास करू शकतात. गुजरात मोदीमय होतं, मी जेव्हा सभांना गेलो तेव्हाच ते मी अनुभवलं. मोदींचं नाव घेताच लोकांमध्ये अभुतपूर्व उत्साह दिसून येत होता. तेव्हाच पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार स्पष्ट झालं होतं, असं फडणवीस यांनी गुजरात विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
हेही वाचा : मोठ्या आत्मविश्वासाने केजरीवालांनी तीन नावं कागदावर लिहिली होती; त्या दाव्याचं काय झालं?
काँग्रेस, आपला टोला
भाजपाने पुन्हा एकदा गुजरातमध्ये सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी देखील रिंगणात असल्यामुळे निवडणूक चुरशीची होईल असं वाटत होतं. मात्र सर्वांचे अंदाज चुकवत भाजपाने गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यानंतर फडणवीस यांनी काँग्रेस आणि आपला टोला लगावला आहे. काँग्रेस गुजरामध्ये आजवरच्या सर्वात निचांकी स्थानी आहे. तसेच आमचाच विजय होणार असं लिहून देणारा आप हा फक्त दिल्लीपुरता मर्यादीत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी निवडून आलेल्या सर्व भाजप उमेदवारांचे अभिनंदन देखील केले आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर
हिमाचल निवडणुकीवर प्रतिक्रिया
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. मात्र दुसरीकडे हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसने भाजपाला मात दिली आहे. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिमाचल प्रदेशचा तो ट्रेंडच आहे. तिथे दर पाच वर्षांनी सत्ता बदलते. आम्हाला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा एक टक्का कमी मतं मिळाले. काँग्रेसला जास्त मतदान झालं. आम्हाला जर एक टक्का जास्त मतदान झालं असतं तर आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो असतो. हिमाचल प्रदेशमध्ये सरकार बनवण्याठी माझ्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, BJP, Devendra Fadnavis, Narendra modi