बुलडाणा, 14 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही फारसं काही वेगळ चित्र पहायला मिळणार नाही. कर्नाटकमधील विजय ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावरून आता शिंदे गटाने महाविकास आघाडीवर विशेष: ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. नेमकं काय म्हणाले प्रतापराव जाधव? कर्नाटकातील काँग्रेसचा विजय ही जरी विजयाची नांदी असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या विजयातून काहीही मिळणार नाही. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही ठाकरे गटाचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच झाला आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर साखर पान वाटण्याचा प्रकार उद्धव ठाकरे करत असल्याचा हल्लाबोल खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
संजय राऊतांवर निशाणा दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निर्णय घ्यायचा आहे. मात्र राहुल नार्वेकर हा निर्णय घेताना 16 ही आमदारांना अपात्र ठरवतील आणि येत्या तीन महिन्यात हे सरकार पडेल असं भाकित संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला आहे. संजय राऊत हे काही भविष्यकार नाही. संजय राऊत यांनी गेल्या काही काळात अनेकदा हे सरकार दोन दिवसात पडेल चार दिवसात पडेल अशी भाकीत केली होती. तेव्हाही हे सरकार पडलं नाही. त्यामुळे तीन महिन्यानंतर हे सरकार पडणार नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.