अहमदनगर, 12 मार्च : नागालँडमध्ये रीपाईला चांगलं यश मिळालं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नागालँडमध्ये रीपाईचे दोन आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर पक्ष चांगलाच सक्रिय झाला आहे. शिर्डीत पक्षाचं महाधिवेशन होणार असून, या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांसहस अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा शिर्डीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हणाले आठवले शिर्डीत महाअधिवेशन होणार असून, या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांसह इतर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, मी शिर्डीतून पराभूत झालो होतो. मात्र आता मला पुन्हा शिर्डीतूनच उभं राहण्याची इच्छा आहे. जर भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डीतून लोकसभेची निवडणूक निश्चितपणे लढवेल. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करेल असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना टोला दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. शिवसेनेचं चिन्ह आणि नाव देण्याचा निर्णय लोकशाहीनुसार झाला आहे. निवडणूक आयोगानं बहुमताच्या बाजुनं निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरेंनी अगोदरच भाजपसोबत सरकार स्थापन करायला पाहिजे होते. भाजपसोबत सरकार स्थापन केले असते तर आज ही वेळ आली नसती. त्यांना त्यांचे आमदारही सांभाळता आले नाहीत. ते काँग्रेससोबत गेल्यानं आमदारांच्या मनात खदखद होती असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.