मुंबई,12 जानेवारी- बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ला ओळखलं जातं. आपला अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर एकेकाळी अभिनेत्रीने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. माधुरीचा जलवा आजही कायम आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आज वयाच्या पन्नाशीतही अभिनेत्री अतिशय फिट आणि तितकीच सक्रिय आहे. काही वर्षांपूर्वी परदेशातून भारतात परतल्यानंतर माधुरी पुन्हा एकदा मोठ्या आणि छोट्या पडद्यावर सक्रिय झाली आहे. आजही माधुरी आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत आहे. माधुरी सध्या चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावरील अनेक रिऍलिटी शो जज करत आहे. परंतु आज आपण अभिनेत्रीच्या वैव्यक्तीक आयुष्यातील एका बहुचर्चित गोष्टीवर प्रकाशझोत टाकणार आहोत. आज अभिनेत्री माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम नेनेसोबत आपलं आयुष्य जगत आहे. गेली 23 वर्षे त्यांच्यासोबत सुखाचा संसार करत आहे. माधुरी आज दोन मुलांची आई आहे. आज माधुरीचं वैवाहिक आयुष्य सुखा-समाधानाने सुरु असलं, तरी एकेकाळी अभिनेत्रीला प्रेमात फारच कठीण काळाला सामोरं जावं लागलं होतं. बॉलिवूड धकधक गर्ल माधुरी दीक्षित एकेकाळी बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थातच अभिनेता संजय दत्तच्या प्रेमात होती. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. माधुरी आणि संजय ज्यावेळी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यावेळी संजय दत्तचं पहिलं लग्न झालं होतं. इतकंच नव्हे तर त्याला एक मुलगीदेखील होती. मात्र दुर्दैवाने कॅन्सरने त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं. (हे वाचा: Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने खरेदी केलं आलिशान घर; किंमत वाचून बसणार नाही विश्वास **)** अशी सुरु झाली लव्हस्टोरी- माधुरी दीक्षित आणि संजय दत्त आपल्या काळातले अतिशय लोकप्रिय कलाकार आहेत. या दोघांनी अनेक दमदार चित्रपट देत आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमठवला आहे. माधुरी आणि संजयने एकत्र साजन, थानेदार, कानून अपना-अपना, खलनायक अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1991 मध्ये आलेल्या ‘साजन’ या चित्रपटाच्या कथानक आणि गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं होतं. यामध्ये माधुरी आणि संजयसोबत सलमान खानदेखील होता. ‘साजन’ चित्रपटाच्या सेटवरच माधुरी आणि संजय यांच्यात जवळीकता वाढली होती. आणि बघता-बघता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. परंतु संजयचं याआधीच एक लग्न झालं असल्याने आणि त्याला एक मुलगीही असल्याने माधुरीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नात्यावर आक्षेप घेत विरोध केला होता. मात्र तरीही माधुरी संजयवर प्रचंड प्रेम करत असल्याचं म्हटलं जातं. परंतु या दोघांच्या आयुष्यात एक काळ असा आला की, या दोघांच्या नात्याचा अनपेक्षित शेवट झाला.
संजय दत्तला अटक- संजय दत्त त्याकाळात ‘बॅड बॉय’ म्हणून ओळखला जात होता. 1993च्या बॉम्बस्फोटात संजय दत्तवर अनेक आरोप लागले होते. अशातच त्याला अटकदेखील झाली होती. ही घटना संजयवर प्रेम करणाऱ्या माधुरीसाठी अतिशय धक्कादायक होती. संजय तुरुंगात गेल्यांनंतर माधुरीने त्याच्यासोबतचे आपले सर्व संबंध तोडले होते. असं म्हटलं जातं की, जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय दत्तने माधुरीसोबत बोलण्याचाही प्रयत्न केला होता मात्र माधुरीने त्याच्या कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया दिली नव्हती. आणि त्यानंतर पुढे माधुरीने डॉ. नेने सोबत लग्न करत आपला संसार थाटला आहे.