मुंबई, 28 जानेवारी : बॉलिवूड इंडस्ट्रीतली एक अत्यंत लोकप्रिय जोडी म्हणजे अजय देवगण आणि काजोल. त्यांचे परस्परविरोधी स्वभाव पाहता हे लग्न कसं झालं, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांच्या लग्नाला आता 20पेक्षाही जास्त वर्षं पूर्ण झाली आहेत. काजोलचा हलका-फुलका, खोडकर स्वभाव आणि अजय देवगणचा शांत स्वभाव यामुळे त्यांचं कसं जुळणार असं वाटत असणाऱ्यांनाही आता त्यांच्यातलं नातं भुरळ घालतं.
'हलचल' या 1995 सालच्या चित्रपटाच्या शूटिंगपासून या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. आधी अभिनेत्री दिव्या भारती हिला या चित्रपटात नायिकेची भूमिका देण्यात आली होती. तिच्या अकाली मृत्यूनंतर ही भूमिका काजोलला मिळाली व तिथेच अजय देवगण व काजोल यांची मैत्री वाढली. त्या काळात काजोल दुसऱ्या कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये होती; मात्र थोड्याच दिवसांत तिचं ब्रेकअप झालं. त्या वेळी अजयनं तिला खूप मानसिक आधार दिला. हळूहळू त्यांचं नातं फुललं व 24 फेब्रुवारी 1999 रोजी त्यांनी लग्न केलं.
हेही वाचा - Masaba Gupta Wedding: लेक मसाबाच्या लग्नात आले व्हिव्हियन रिचर्ड्स; पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंब दिसलं एकत्र
त्यांच्यातलं हे प्रेम पहिल्या नजरेतलं प्रेम वगैरे नव्हतं याबद्दलही काजोलनं सांगितलं. खरं तर पहिल्या भेटीत अजय देवगण काजोलला फारसा आवडला नव्हता; मात्र हळूहळू सहवासानं त्यांचं नातं जुळलं. काजोलच्या वडिलांनाही हे लग्न मान्य नव्हतं. त्यांना अजय देवगणबाबत काहीही तक्रार नव्हती; पण तरीही त्यांनी काजोलला खूप समजावलं होतं.
लग्नावेळी काजोलचं वय 24 वर्षांचं होतं. तिच्या आई-वडिलांना इतक्या कमी वयात काजोलनं लग्न करणं पटत नव्हतं. 2018मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत काजोलनं सांगितलं, की तिचे वडील शोमू मुखर्जी या लग्नाबाबत नाराज होते. त्यामुळे लग्नानंतर जवळपास एक आठवडा ते बोलत नव्हते. त्यांनी तिला सांगितलं, की 'तू अजून लहान आहेस, तुझं करिअरही चांगलं चाललं आहे. त्यामुळे इतक्या कमी वयात तू लग्न करू नयेस;' मात्र काजोलनं कोणाचंही न ऐकता अजय देवगणसोबत लग्नगाठ बांधली. आज त्यांची जोडी इंडस्ट्रीमधली खूप लोकप्रिय जोडी आहे.
हेही वाचा - Kajol Ajay Devgan : अजय देवगणसोबतच्या नात्याबद्दल काजोलने केला धक्कादायक खुलासा; सांगितला वेदनादायक प्रवास
'द कपिल शर्मा शो'मध्ये काजोल आणि अजय देवगणने त्यांच्या या नात्याविषयी गप्पा मारल्या. त्यांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही, हे काजोलने सांगितलेल्या अनुभवांमधून समोर आलं.या शोमध्ये काजोलने त्यांच्या हनिमूनच्या काही आठवणी सांगितल्या. त्यात काजोल म्हणाली, 'लग्नानंतर आम्ही हनिमूनसाठी वर्ल्ड टूरवर जायचं ठरवलं होतं. तशी तयारीही केली. बॅगा भरल्या आणि निघालो; पण काहीच दिवसांत अजयची अवस्था वाईट झाली. होम सिक झाल्यामुळे अजय देवगणला घरी परतावंसं वाटू लागलं. घरी जाण्यासाठी तो हाता-पायाही पडू लागला.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Marathi entertainment, Marathi news