23 ऑक्टोबरला होणार भारत-पाक सामना
मेलबर्न, 21 ऑक्टोबर: आयसीसी टी20 वर्ल्ड कप मध्ये सुपर 12 फेरीला सुरुवात होण्यास एकच दिवस बाकी आहे. 22 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सामन्यानं सुपर 12 फेरीला सुरुवात होणार आहे. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच रविवारी भारतीय संघ विश्वचषक मोहिमेतला पहिला सामना खेळणार आहे. तोही पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. भारत-पाकिस्तान मॅच म्हटली की त्याआधी नेहमीच अनेक चर्चा रंगतात. त्यात सध्या गुगलवरही अनेक गोष्टी सर्च केल्या जात आहेत. आणि त्यात सध्या जी गोष्ट सर्वात जास्त सर्च केली जातेय त्याचा खुलासा कोलकाता नाईट रायडर्सनं केलाय. केकेआरची पोस्ट चर्चेत कोलकाता नाईट रायडर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गुगल सर्चचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत राहुल द्रविड आणि रोहित शर्मा दिसत आहेत. त्यासह खाली एक Google सर्च आहे. ज्यात भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान मेलबर्नच्या हवामानाबाबतच्या अपडेट्सबद्दल अनेक जण सर्च करत आहेत. हा फोटो शेअर करताना केकेआरने कॅप्शनमध्ये लिहिलंय, वरुणराजा दया कर!
मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता दरम्यान 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान संघात महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघांचा हा यंदाच्या वर्ल्ड कपमधला पहिलाच सामना असणार आहे. पण या महामुकाबल्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविवारी मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता 80 टक्के असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. ब्रिस्बेनमध्ये बुधवारी भारत आणि न्यूझीलंड संघातला सराव सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यात भारत-पाक सामन्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि तसं झालं तर लाखो चाहत्यांचा हिरमोड होणारआहे. हेही वाचा - T20 World Cup: वेस्ट इंडिजवर आली बॅग भरण्याची वेळ… टी20 वर्ल्ड कप इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच घडलं! राखीव दिवस नाही भारत आणि पाकिस्तान संघातला सामना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. Accuweather.com या हवामानविषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटनुसार मेलबर्नमध्ये सामन्यादिवशी संध्याकाळी सलग दोन तास मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सामन्यात एकही बॉलचा खेळ न होण्याची शक्यताही आहे. पण या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. ग्रुप स्टेजमध्ये कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. रद्द झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल. पण सेमी फायनल किंवा फायनलमध्ये पावसामुळे सामना रद्द झाल्यास राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.