बीसीसीआयचा नवा प्लॅन
मुंबई, 29 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय टीममध्ये येत्या काळात प्रचंड मोठे बदल घडून येण्याची चिन्ह आहेत. त्याची सुरुवातही बीसीसीआयनं केली आहे. पण याचदरम्यान आता बीसीसीआय आगामी वन डे वर्ल्ड कपच्या दृष्टीनं मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे भारतीय संघातल्या सिनियर खेळाडूंसाठी टी20 टीमची दारं कायमची बंद होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. काय आहे बीसीसीआयचा प्लॅन? बीसीसीआयनं वन डे वर्ल्ड कपच्या निमित्तानं सिनियर खेळाडूंना टी20 सामन्यातून विश्रांती देण्याच्या विचारात आहे. तर टी20 वर्ल्ड कप 2024 साठी युवा खेळाडूंची नवी फौज उभारण्याचीही तयारी सुरु आहे. या टीमचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियाचे तीन सिनियर प्लेयर टी20 क्रिकेटमधून कायमस्वरुपी बाहेर जाणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
हेही वाचा - Womens IPL: वुमन्स IPL ची टीम विकत घेण्यासाठी फ्रँचायझीकडे हवेत इतके कोटी! बेस प्राईस बघूनच व्हाल हैराण कोण आहेत ते सिनियर प्लेयर्स? रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन हे नुकत्याच पार पडलेल्या टी20 वर्ल्ड कप संघाचा भाग होते. आगामी वन डे वर्ल्ड कपमध्ये रोहित आणि विराटवर मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये त्यांना भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. अश्विनलाही केवळ कसोटी संघातच स्थान दिलं जाईल अशी माहिती आहे. त्यामुळे 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये हे तिघेही खेळताना दिसणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. आणि ते खेळ्याची शक्यताही फार कमी वाटत आहे.