विराट कोहली मुंबईत परतला
मुंबई, 12 नोव्हेंबर: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आज ऑस्ट्रेलियातून मुंबईत दाखल झाला. विराटनं यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये दमदार बॅटिंग केली. पण भारतीय संघाला फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाचे काही खेळाडू मायदेशी परतले तर काही जण न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना झाले. दरम्यान विराट आज सकाळी अॅडलेडहून मुंबई एअरपोर्टवर दाखल झाला. यावेळी अनेक फॅन्स आणि फोटोग्राफर एअरपोर्टवर उपस्थित होते. विराटनं फॅन्सना दिली अशी प्रतिक्रिया… एअरपोर्टमधून बाहेर येताना आज विराट शांत दिसला. तरीही त्यानं फॅन्स आणि फोटोग्राफर्सना फोटो काढू दिले. आणि सर्वांना पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवादही दिले. त्यानंतर गाडीत बसून तो घरी रवाना झाला. सोशल मीडियावर सध्या विराटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
विराटचं दमदार प्रदर्शन विराट कोहली टी20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा किंग ठरला. त्यानं या वर्ल्ड कपमध्ये 6 मॅचमध्ये तब्बल 296 धावांचा रतीब घातला. सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. त्यानं या वर्ल्ड कपमध्ये 6 पैकी 4 इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं. दरम्यान 2014 आणि 2016 च्या टी20 वर्ल्ड कपमध्येही विराट कोहली प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा मानकरी ठरला होता. यंदाही या पुरस्कारासाठी त्याच्याच नावाची चर्चा आहे.