पहिल्या शतकानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना सचिन
मुंबई, 14 ऑगस्ट**:** मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंचरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आज जवळपास एक दशक लोटत आलंय. पण सचिन या नावाची क्रेझ आजही क्रिकेटविश्वात कायम आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिननं आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत विक्रमांचे अनेक इमले उभारले. यातले बरेच विक्रम आजही अबाधित आहेत. आणि त्यातलाच एक विक्रम आहे तो सर्वाधिक शतकांचा. सचिननं वन डेत 49 आणि कसोटीत 51 अशी मिळून 100 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहेत. पण यातलं पहिलं शतक त्यानं केलं होतं ते आजच्याच दिवशी तेही 32 वर्षांपूर्वी. विक्रमी शतकांची मुहूर्तमेढ 14 ऑगस्ट 1990. ही तीच तारीख आहे ज्यादिवशी 17 वर्षांच्या सचिननं आपल्या कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं होतं. 1990 साली मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. याच दौऱ्यातल्या मॅन्चेस्टर कसोटीत सचिननं हे विक्रमी शतक साजरं केलं होतं. कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताची दाणादाण उडाली होती. आणि सामना हातातून जाणार अशीच परिस्थिती होती. पण कोवळ्या सचिननं मनोज प्रभाकरच्या साथीनं सातव्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी साकारली आणि हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं.
दुसऱ्या डावात सचिननं नाबाद 119 धावांची खेळी केली होती. इतकच नव्हे तर पहिल्या डावात 68 आणि दुसऱ्या डावातल्या नाबाद 119 धावांच्या खेळीमुळे सचिनला सामनावीराचा बहुमान देण्यात आला. अशा प्रकारे सचिनचं पहिलं शतक खरोखरच यादगार ठरलं होतं. हेही वाचा - Rahul Dravid: ‘जंगलात 4 हजार वाघ पण राहुल द्रविड एकच!’ पाहा रॉस टेलरच्या आत्मचरित्रातला भन्नाट किस्सा बीसीसीआयकडून फोटो शेअर 32 वर्षांपूर्वीच्या सचिनच्या त्या पहिल्या शतकाची आठवण म्हणून बीसीसीआयनं आज एक फोटो ट्विट केला आहे.
सचिननची देदिप्यमान कारकीर्द क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिननं उभारलेले विक्रमांचे अनेक इमले सहजासहजी सर होतील याची शक्यता फार कमी आहे. 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत वन डे आणि कसोटीत सर्वाधिक धावा सचिनच्या नावावर जमा आहेत. त्यानं वन डेत 18426 तर कसोटीत 15921 धावांचा रतीब घातलाय. दोन्ही फॉरमॅटमध्ये 100 शतकंही त्याच्या नावावर आहे. सर्वाधिक 463 वन डे आणि 200 कसोटी खेळण्याचा विक्रमही सचिनच्याच नावावर आहे. 1989 साली पदार्पण करणाऱ्या सचिननं नोव्हेंबर 2013 साली आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता.