उद्धव ठाकरे
दिल्ली, 23 फेब्रुवारी : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्यात आला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गटाला देण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानं आता ठाकरे गटाला मशाल चिन्ह घेऊनच निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे. मात्र इथेही ठाकरे गटाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. समता पक्षाच्या वतीनं मशाल चिन्हावर दावा करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर समता पक्षाच्या शिष्टमंडळानं काही दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर आज समता पक्षाच्या वतीनंं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. समता पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही पक्षानं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला होता. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवण्यात आलं होतं. अखेर पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का होता. मात्र या धक्क्यासोबतच आणखी एक धक्का बसला आहे, तो म्हणजे निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला जे मशाल हे चिन्ह दिलं आहे, त्यावर देखील समता पक्षाने आपला दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात समता पक्ष आज सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.
ठाकरे गटाला दिलासा मिळणार? समता पक्षाकडून आज निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्ट या याचिकेवर काय निर्णय घेणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवल्यास ठाकरे गटाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.