लातूर, 12 जुलै: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सातत्यानं कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटांना सामोरं जावं लागलं. गेल्या काही काळात राज्यात मान्सूनची एन्ट्री झाली असली तरी पावसानं मराठवाड्याकडे पाठच फिरवली आहे. मात्र, शेतकऱ्यांना दुसऱ्या एका संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. नव्यानं पेरणी केलेल्या सोयाबीनसह इतर पिकांना गोगलगायींचा धोका आहे. याबाबत लातूर आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागानं विशेष उपाय सांगितले आहेत. कृषी विभागाचे आवाहन जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा गोगलगायीद्वारे अंडी टाकण्याचा राहणार आहे. जुलै महिन्याचा पहिला पंधरवाडा गोगलगायीच्या प्रभावी नियंत्रणासाठी निर्णायक राहणार आहे. त्यामुळे पहिल्या पंधरवाड्यातच सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरूपात गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभाग व कृषि विद्यापीठाने केले आहे.
गोगलगायी सुप्तावस्थेतून बाहेर सर्वसाधारण गोगलगायी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमिनीखाली सुप्तावस्थेत जातात आणि जून महिन्यात चांगला पाऊस होताच त्या सुप्तावस्थेतून बाहेर येऊन जमिनीच्यावर येतात. मागीलवर्षी सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगायी चालू वर्षातील जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात झालेल्या पावसानंतर सुप्तावस्था संपवून जमिनीच्या वर आलेल्या आहेत. गोगलगायी वाढण्याचा हंगाम सध्या मागीलवर्षी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे दुबार पेरणी कराव्या लागलेल्या क्षेत्रामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहे. सुप्तावस्था संपवून जमिनीवर आलेल्या गोगलगायी पहिल्या पंधरा दिवसात समान आकाराच्या गोगलगायीशी संग करून पंधरा दिवसानंतर जमिनीच्याखाली प्रत्येक गोगलगाय 100 ते 150 अंडी टाकणार आहे. या अंड्याद्वारे गोगलगायीची पुढील वर्षाची पिढी तयार होणार आहे. त्यामुळे अंडी टाकण्याच्या अगोदर जर आपण गोगलगायीचे नियंत्रण केले तर चालू हंगामातील सोयाबीन पिकाबरोबरच पुढील वर्षातील सोयाबीन पिकाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे, असे सोयाबीन अभ्यासक डॉ. अरुण गुट्टे यांनी सांगितले. शेती न करता कमवा हेक्टरी सव्वा लाख रुपये, शिंदे सरकारची खास योजना, Video गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन गोगलगायी सोयाबीन पिकाचे रोपावस्थेत मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे रोपावस्थापूर्वीच गोगलगायीचे नियंत्रण करणे आवशयक आहे. सध्या सुप्तावस्थेतून बाहेर आलेल्या गोगलगायी दररोज सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान बांधाच्या बाजूने आढळून येत आहेत. त्यामुळे गोगलगायीच्या प्रभावी नियंत्रणासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरुपात सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान शेतात जाऊन जमिनीच्या वर आलेल्या गोगलगायी गोळा कराव्यात. गोळा केलेल्या गोगलगायी कुठेही न टाकून देता साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात किंवा गोळा केलेल्या गोगलगायींवर मीठ किंवा चुन्याची भुकटी टाकावी, असा सल्ला डॉ. गुट्टे यांनी दिला आहे. असं करा गोगलगायींचं नियंत्रण सुतळीचे बारदाने गुळाच्या पाण्यात भिजवून आदल्या दिवशी बांधाच्या बाजूने रॅन्डम पद्धतीने टाकावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बारदान्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून मिठाच्या अथवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायी गोळा करताना हातात हातमोजे घालणे आवश्यक आहे, असेही डॉक्टर सांगतात. कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती, पाहा लातूर महानगरपालिकेचा खास प्रकल्प Video तर स्नेलकिल गोळ्यांचा करा वापर याशिवाय स्नेलकिलच्या छोट्या छोट्या गोळ्या बांधाच्या बाजूने 5 ते 7 फुट अंतरावर टाकून द्याव्यात. गोगलगायीचा प्रादुर्भाव जास्त क्षेत्रावर झाला असल्यास स्नेलकिल गोळ्याची पावडर तयार करून पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करावी आणि अशी पेस्ट मूरमुऱ्याला लावावी. असे मुरमुरे गोगलगाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रावर टाकावेत. स्नेलकिल हे औषध गोगलगायींना आकर्षून घेते आणि या स्नेलकिल गोळीला किंवा स्नेलकिलयुक्त मूरमुऱ्याला खाल्यानंतर 4 ते 5 तासात गोगलगायीच्या शरीरातील स्त्राव बाहेर पडून गोगलगायी नष्ट होतात, असं डॉ. गुट्टे सांगतात.