भाजपचं उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर
मुंबई, 25 जुलै : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. माझं सरकार वाहून गेलं नव्हतं तर धरण खेकड्यांनी पोखरलं असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ते ‘सामना’चे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. ही मुलाखत दोन भागांमध्ये दाखवली जाणार आहे, या मुलाखतीचा पहिला भाग हा उद्या बुधवारी सकाळी आठ वाजता दाखवला जाणार आहे, तर दुसरा भाग परवा म्हणजेच गुरवारी दाखवला जाणार आहे.
भाजपवर हल्लाबोल या मुलाखतीचं एक टिझर संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. टिझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माझं सरकार मुसळधार पावसात वाहून गेलं नाही तर धरण खेकड्यांनी पोखरलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की उटसूट दिल्लीत जाऊन मुजरा घालणारी आमची संस्कृती नाही, आमचे विचार बाळासाहेबांचे विचार आहेत.
भाजपचं सडतोड प्रत्युत्तर दरम्यान या टिझरनंतर भाजप देखील आक्रमक झालं आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘लोकं उत्सुक आहेत, मित्र पक्षाला कसा धोका दिला हे ऐकण्यासाठी, मुख्यमंत्री पदी असतानाही अडीच वर्ष घरी असल्याची कहाणी ऐकण्यासाठी, विचारधारेला बाजूला टाकून महत्त्वकांक्षेसाठी सत्ता मिळवण्याची गोष्ट ऐकण्यासाठी, कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून वाढवलेला पक्ष तुमच्या अहंकरापोटी फुटल्याची कहाणी ऐकण्यासाठी आणि हे सगळं कसं बरोबर आहे हे सांगण्यासाठी संजय राऊत यांनी लिहून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्यासाठी’ असं ट्विट उपाध्ये यांनी केलं आहे.