मुंबई 13 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) कोणत्याही विषयावर बोलण्यास मागे पुढे पाहात नाही. मग तो धार्मिक विषय असो, सामाजिक किंवा उद्योगासंबंधी. याआधीही कंगना वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडत असताना वादाच्या भोवऱ्यात सापडली होती आणि कधीकधी तिचं या धाडसासाठी अनेकांनी कौतुकही केलं. अलीकडेच शेतकरी आंदोलनावरील आपल्या वक्तव्यांमुळं कंगना ट्रोलर्सच्या निशाण्यावर होती. अशात आता रिंकू शर्मा हत्या प्रकरणाबाबत (Rinku Sharma Murder Case) कंगनानं दिल्लीतील केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे. कंगनानं एक ट्वीट केलं आहे, ज्यात तिनं अरविंद केजरीवाल यांना रिंकू शर्मा हत्या प्रकरणाबाबत सल्ला दिला आहे. कंगनानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, प्रिय अरविंद केजरीवाल जी, मला खरोखर आशा आहे, की तुम्ही रिंकू शर्माच्या कुटुंबाची भेट घ्याल आणि त्यांना पाठिंबा द्याल,. तुम्ही एक चांगला नेता आहात. मी आशा करते, की आपण एक चांगले राजकारणीदेखील व्हाल. अरविंद केजरीवाल यांचं ऑक्टोबर 2015 चं ट्वीट पुन्हा रिट्वीट करत कंगनानं त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल यांनी अखलाकसंदर्भात हे ट्वीट केलं होतं. गोमांस खाण्याच्या अफवा पसरल्यानंतर अखलाक याला मारहाण करण्यात आली. अखलाकसोबत झालेल्या या हिंसाचारानंतर बरीच खळबळ उडाली होती. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अखलाकच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी उत्तर प्रदेशमधील दादरी येथे पोहोचले होते. याच वेळचं हे ट्वीट होतं. अशात आता कंगना रणौतनं आशा व्यक्त केली आहे, की ज्याप्रकारे अरविंद केजरीवाल अखलाकच्या कुटुंबाला भेटायला आले. त्याचप्रमाणे रिंकू शर्माच्या कुटुंबीयांनाही भेटतील आणि त्यांना सर्वोतपरी मदत करतील.
काय आहे रिंकू शर्मा प्रकरण - दिल्लीतील मंगोलीपुरी परिसरात काही तरुणांनी मिळून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाची ओळख रिंकू शर्मा अशी पटवण्यात आली आहे. रिंकूच्या काही जवळच्या व्यक्तींनी अशी माहिती दिली की, गेल्या महिन्यात त्याने राम मंदिर निर्माणासंदर्भात जागरुकता रॅली काढण्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यावेळी परिसरातील काही तरुणांशी रिंकूचा वाद झाला होता. पण काही वेळाने ते प्रकरण मिटलेदेखील होते. बुधवारी रात्री त्याच्या घराजवळच आयोजित एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हल्लेखोर आणि रिंकू यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.