मुंबई 28 मार्च**:** मानवेल गायकवाड (Manvel Gaikwad) हे मराठी संगीतसृष्टीतील एक नामांकित संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर ‘जवा नवीन पोपट हा’, ‘घंटी वाजवली आंटीची’, ‘हेलो मी पुजारी बोलतोय’ यांसारख्या अनेक सुपरहिट लोकगीतांची निर्मिती केली आहे. ‘माझी सख्खी बायको गेली’ (Geli Majhi Sakkhi Bayko Geli) हे देखील त्यांच्या अशाच अनेक सुपरहिट गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं त्यांना कसं सूचलं याचा एक भन्नाट किस्सा आहे. हा किस्सा वाचून तुम्ही देखील हसून हसून वेडे व्हाल. पाहा काय होता तो किस्सा**?** मानवेल गायकवाड यांना सभोवताली घडणाऱ्या घटनांमधून गाणी तयार करण्याची प्रेरणा मिळायची. असाच काहीसा प्रकार या गाण्याच्या बाबतीतही घडला होता. ते ज्या चाळीत राहायचे त्या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला. अन् त्या महिलेचा पती जोरजोरात रडत होता. अर्थात तो दु:खानं व्याकूळ झाला होता. परंतु रडता रडता तो जी काही वाक्य उच्चारत होता त्यातून मानवेल यांना माझी सख्खी बायको गेली हे गाणं सुचलं. अवश्य पाहा - कसं सूचलं ‘आंटीची घंटी’ गाणं; पाहा मिलिंद शिंदेंचा भन्नाट किस्सा
हे गाणं लिहिताना ते विनोदी अंगानंच तयार व्हावं असा प्रयत्न ते करत होते. मानवेल गायकवाड यांनी हे गाणं लिहिल्यानंतर गायक सूर्यकांत शिंदे आणि गायिका शकुंतला जाधव यांना घेऊन हे गाणं रेकॉर्ड केलं. पण या गाण्यात जो फिल हवा होता, तो येत नव्हता. अनेक प्रयत्न केल्यानंतरही गाण्यात जो खट्याळपणा हवा तो येत नसल्याने अखेर मानवेल गायकवाड यांनी स्वत: ते गाणं गायलं. अन् हे गाणं सुपरहिट झालं. आज या गाण्याला जवळपास 20-25 वर्ष उलटून गेली आहे. परंतु आजही हे गाणं तितक्यात जल्लोषानं वाजवलं जातं. यावरुन या गाण्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.