नवी दिल्ली 10 मार्च : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधातील ट्वीट अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) चांगलंच भोवलं आहे. कंगना अनेक विषयांवर ट्वीट करत आपलं मत मांडत असते. अशात कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना विरोध करत कंगनानं एका ट्वीटमध्ये त्यांना थेट दहशतवादी म्हटलं होतं. याच कारणामुळे अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली गुरुद्वारा कमिटीकडून दाखल याचिकेवर दिल्लीतील जिल्हा न्यायालयानं पोलिसांना अॅक्शन टेकन रिपोर्ट म्हणजेच कारवाईचा अहवाल (Action Taken Report) मागितला आहे.
न्यायालयानं पोलिसांना म्हटलं, की प्रकरणात काय काय झालं, याबद्दल 24 एप्रिलपर्यंत सर्व माहिती द्या. दिल्लीच्या नॉर्थ एवेन्यू ठाण्याला न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. कंगनाविरोधात एफआयआर दाखल (FIR against Kangana Ranaut) करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेत असा आरोप लावला गेला होता, की अपमानास्पद ट्वीटमधून (Derogatory Tweets) विवध समूहांमध्ये असंतोष पसरवण्याचं काम केलं जात आहे.
काय होतं कंगनाचं ट्वीट - अभिनेत्री कंगना रणौतनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, की पंतप्रधान जी, जो झोपला आहे त्याला उठवता येतं, ज्याचा गैरसमज झाला आहे त्याला समजावून सांगता येतं. मात्र, कोणी झोपण्याचं सोंग करत असेल न समजल्याचं नाटक करत असेल तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही कितीही समजावलं तरी काही फरक पडेल का? हे तेच दहशतवादी आहेत, CAA मुळं एकाही नागरिकाचं नागरिकत्व धोक्यात आलं नाही, मात्र तरीही यांनी रक्ताच्या नद्या वाहावल्या.