नवी दिल्ली, 22 मार्च: सोमवारी नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर याठिकाणी 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) च्या छिछोरे (Chhichhore) सिनेमाने मानाचा पुरस्कार जिंकला आहे. श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), प्रतीक बब्बर, वरुण शर्मा, ताहिर राज आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर या सिनेमाने ‘सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा’ (Best Hindi Film) हा पुरस्कार पटकावला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. छिछोरे या सिनेमांने प्रेक्षकांचे मन तर जिंकलेच होते, पण त्याचबरोबर समीक्षकांकडून देखील वाहवा मिळवली होती. कोरोनामुळे दीर्घकाळासाठी लांबलेल्या या पुरस्कार सोहळ्याची घोषणा आज करण्यात आली. 2019 साठीच्या पुरस्कारांची घोषणा आज केली गेली. पीआयबी इंडियाने (PIB India) ने त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरस्कारांची घोषणा केली आहे.
या सोहळ्यात अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. पंगा आणि मणिकर्णिका (Panga and Manikarnika) या चित्रपटात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कंगनासोबतच अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यानं देखील सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारावर आपलं नावं कोरलं. त्याला भोंसले या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. मनोज वाजपेयीबरोबर अभिनेता धनुषला (Dhanush) देखील असूरन (Asuran) सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.