नीरज कुमार, प्रतिनिधी बेगुसराय, 5 जून : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी तीन रेल्वे एकमेकांवर आदळल्या. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या अपघातात तब्बल अडीचशेहून अधिक जणांनी आपला जीव गमावला, तर हजारहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. सरकारने तातडीने या दुर्घटनेची दखल घेतली आहे. पण तुर्तास जखमी अवस्थेत आपल्या घरी पोहोचण्यासाठी जखमींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या अपघातातून बचावलेले 4 जखमी यांना आपल्या गावी पोहोचण्यासाठीही जवळ पैसे नव्हते. कसेबसे नातेवाईकांकडून 36 हजार रुपये जमा करून गावी पोहोचले. बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील 6 नागरिकही या रेल्वेतून प्रवास करत होते. सहाजणांपैकी चौघांना रविवारी बेगुसरायला आणण्यात आलं. अपघातात त्यांना एवढा मार लागला आहे की, ते मानसिकरीत्या पूर्णपणे खचले आहेत. त्यांच्यावर योग्य ते उपचार झाले नाहीत, तर त्यांच्या आयुष्याचं फार मोठं नुकसान होईल. अपघात झाला त्याठिकाणाहून आपल्या राज्यात जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र कुटुंबीयांच्या मदतीने आणि इतरांकडून देणगी मिळवून ते 36,000 रुपयांचा खर्च करून कसेबसे रुग्णवाहिकेने बिहारला पोहोचले.
हरदिया गावचे रहिवासी मोहम्मद नसरुल्लाह (18 वर्ष), मोहम्मद हैदर (23 वर्ष), मोहम्मद अली (18 वर्ष) तर, चिलमील गावचे रहिवासी मोहम्मद रहमुल्लाह (21 वर्ष), मोहम्मद अखलाक (23 वर्ष), मोहम्मद तस्लीम (30 वर्ष) या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी चौघांना त्यांच्या नातेवाईकांनी बेगुसरायच्या सदर रुग्णालयात दाखल केलं, परंतु तिथे उपचारासाठी कोणतीही मदत मिळत नसून संपूर्ण खर्च त्यांच्या नातेवाईकांनाच करावा लागत आहे. तर अन्य दोघांवर ओडिशातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींच्या अवयवांची सामान्य हालचाल होत नाहीये, त्यांचे नातेवाईक सरकारकडे वारंवार मदतीची मागणी करत आहेत, जेणेकरून त्यांच्यावर वेळेत योग्य ते उपचार करता येतील. Train Accident : ट्रेन रुळावरुन का उतरते? रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे समोर दरम्यान, जखमी मोहम्मद अखलाक यांनी सांगितलं, ‘ते कामासाठी चेन्नईला जात होते. हावडा स्थानकावरून कोरोमंडळ एक्स्प्रेसने ते चेन्नई गाठणार होते. एक्स्प्रेस जवळपास 100 किलोमीटरहून अधिक गतीने धावत होती. तेव्हा अचानक काहीतरी धडकल्याचा जोरदार आवाज आला. तेवढ्यातच जनरल डब्यातला पंखाही तुटून खाली कोसळला. लोक सीटवरून खाली घसरू लागले. सगळ्या बाजूंनी नुसत्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आता आपण वाचू शकत नाही, असं आम्हाला वाटलं होतं, पण नशीब चांगलं की मी जिवंत राहिलो, मला बाहेर काढलं गेलं.’ दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मात्र असं असतानाही अनेक जखमींचे नातेवाईक त्यांच्या उपचारांसाठी अद्यापही मदतीची आस लावून बसले आहेत. कधी सरकारकडून मदत येईल आणि उपचार सुरू होतील, याची प्रतीक्षा त्यांना आहे.