नवी दिल्ली, 15 जून : कोरोना महामारीमुळे देशात सध्या अनेक सेक्टरमध्ये वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू आहे. जवळपास एक वर्षापासून सुरू असलेल्या या वर्क कल्चरवर आता नवी चर्चा सुरू झाली आहे. अनेक कंपन्यांमध्ये ऑफिसेस हळू-हळू सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. एका रिपोर्टनुसार, अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय हवा आहे.
TCS -
देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर एक्सपोर्टर कंपनी टाटा कसल्टेंसी सर्विसेसचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितलं, की महामारी संपल्यानंतर कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करण्याबाबत सांगेल. टीसीएसच्या वार्षिक बैठकीत त्यांनी सांगितलं, की लोकांना एकमेकांशी भेटणं गरजेचं आहे, ही सामाजिक गरज आहे. कोरोना संपल्यानंतर काही बदल होतील, त्यावेळी लोकांना ऑफिसला येण्याबाबत सांगितलं जाऊ शकतं. सध्या कोरोनामुळे टीसीएसचे 97 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत.
टीसीएसच्या 4.88 लाख कर्मचाऱ्यांपैकी 5 टक्के लोक कोरोनाबाधित झाले. जे कोरोनासंक्रमित झाले, त्यापैकी 80 टक्के लोक पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहितीही चंद्रशेखरन यांनी दिली.
कर्मचाऱ्यांचा Work From Home ला पाठिंबा -
मायक्रोसॉफ्ट इंडियाने महामारीमध्ये वर्क कल्चरवर एक सर्व्हे केला. सर्व्हे रिपोर्टमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. रिपोर्टनुसार, 74 टक्के भारतीय कर्मचारी रिमोर्ट वर्कचा पर्यायच ठेवण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणजे त्यांना आपल्या इच्छेनुसार जिथून हवं तिथे काम करण्याची परवानगी मिळावी.
Work From Home बाबत अनेक बाबी समोर आल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट सर्व्हेनुसार, 62 टक्के कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, की कंपन्या त्यांच्याकडून अधिक काम करुन घेत आहेत. 57 टक्के कर्मचारी कामाचं अधिक ओझ वाटत असल्याचं म्हणतात. तर 32 टक्के कर्मचारी तणाव-थकवा जाणवत असल्याचं सांगतात. एवढंच नाही, तर 13 टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कंपनीला कर्मचाऱ्यांच्या काम आणि जीवनाबाबत कोणतीही काळजी नसल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.