मुंबई, 23 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज गुरुवारी सेमीफायनाचा पहिला सामना पारपडणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय संघांमध्ये फायनल गाठण्यासाठी लढत होणार असून यापैकी एक संघ आज सामना जिंकून थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. परंतु या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाला दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. सेमी फायनल गाठण्यासाठी भारतीय महिला संघाला तब्बल पाच वेळा महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान आहे. हा सामना भारतीय महिला संघासाठी नक्कीच सोपा नसणार असून आता संघातील दोन महत्वाच्या खेळाडूंच्या आजारपणामुळे आणखीनच अवघड बनणार आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अनुभवी गोलंदाज पूजा वस्त्रारकर या दोघींची तब्बेत बरी नसल्याची माहिती मिळत आहे. दोघींना आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सामन्याच्या आदल्या दिवशीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तेव्हा या दोघी सेमी फायनल सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता असून यांच्याबाबतचा निर्णय गुरुवारी सायंकाळ पर्यंत घेतला जाईल. हे ही वाचा : IND VS AUS : सेमी फायनल सामन्यात पाऊस पडल्यास कोणता संघ करणार फायनलमध्ये प्रवेश? हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्रारकर या दोघींना आजारपणामुळे प्लेयिंग 11 च्या बाहेर ठेवण्यात आले तर मात्र भारतीय संघाची महिला टी 20 वर्ल्ड कपची फायनल गाठण्याची संधी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर बारी झाली नाही तर स्मृती मानधना ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचे नेतृत्व करेल. तर कौरच्या अनुपस्थिती हरलीन देओल हिला प्लेयिंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
तसेच पूजा वस्त्रारकर आणि राधा या दोघी आजारी असल्यामुळे भारताच्या गोलंदाजीतही मोठे बदल होऊ शकतात. पूजा आणि राधाच्या अनुपस्थितीत मराठमोळी क्रिकेटर देविका वैद्य आणि अंजली सरवाणीचा यांना प्लेयिंग 11 मध्ये संधी मिळू शकते. भारत आधीच अंडरडॉग म्हणून सामना सुरू करत आहे त्यात दोन प्रमुख खेळाडूंच्या आजारपणामुळे हा सामना भारतासाठी अधिक आव्हानात्मक ठरेल.