मुंबई, 18 ऑगस्ट: टीम इंडियाचा माजी कर्णधार, भारतीय क्रिकेटमधला एक आक्रमक फलंदाज, भारतीय संघाला अनेक मालिका एकहाती जिंकून देणारा खेळाडू अशी विराट कोहलीची ओळख आहे. याच विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण विराटनं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 वर्ष पूर्ण केली आहेत. 2008 साली आजच्याच दिवशी भारताकडून वन डे पदार्पण केलं होतं. श्रीलंकेविरुद्ध वन डे पदार्पण 18 ऑगस्ट 2008 या दिवशी विराट पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यावेळी तो 19 वर्षांचा होता. श्रीलंकेतल्या दंबुला इथे झालेल्या त्या सामन्यात विराट नियमित सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या अनुपस्थितीत सलामीला उतरला होता. त्या सामन्यात विराट 12 धावांवर बाद झाला. भारतानं तो सामना गमावला. पण भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावर त्या दिवशी विराट कोहली नावाच्या ताऱ्याचा उदय झाला होता. अंडर-19 विश्वविजयानं विराट प्रकाशझोतात 2008 साली भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवून अंडर नाईन्टिन विश्वचषक पटकावला. त्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा विराट कर्णधार होता. विराटसह त्या संघात सध्याच्या भारतीय संघातील रवींद्र जाडेजाचाही समावेश होता. त्या कामगिरीनं विराटला भारतीय क्रिकेटमध्ये ओळख मिळवून दिली. आणि त्यानंतर अवघ्या पाच महिन्यात विराटनं भारतीय संघात स्थानही मिळवलं.
विराट कारकीर्द टीम इंडियाच्या या दिग्गज फलंदाजानं आतापर्यंत वन डे, कसोटी आणि टी20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी बजावली आहे. वन डेत त्यानं 10 हजार धावांचा टप्पा गाठलाय. तर कसोटीतही त्यानं 8 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. वन डेत 43 तर कसोटीत 27 अशी तब्बल 70 शतकं विराटच्या नावावर आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत विराट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंगपाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहे. हेही वाचा - BCCI Umpires Exam: हेल्मेटमध्ये बॉल अडकल्यास बॅट्समन कॅच आऊट होईल? बीसीसीआयची अंपायर्सना गुगली 2016 साली टीम इंडियाचा कर्णधार टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 2016 च्या अखेरीस कर्णधारपद सोडलं. त्यानंतर बीसीसीआयनं विराट कोहलीच्या हाती भारतीय संघाची धुरा सोपवली. विराटनं ही जबाबदारी यशस्वीपणे पेलताना इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांना मायदेशातच नव्हे तर त्यांच्या देशातही हरवण्याचा पराक्रम गाजवला. विराटच्या नेतृत्वात 2018 ते 2022 अशी सलग सहा वर्ष कसोटीत भारतीय संघ नंबर वनवर राहिला. 2019 पासून फॉर्मशी झुंज पण गेल्या तीन वर्षांपासून विराटच्या बॅटमधून धावांचा ओघ आटलाय. नोव्हेंबर 2019 पासून त्याच्या बॅटमधून एकही शतक निघालेलं नाही. याचदरम्यानं गेल्या वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकानंतर विराटनं टी20 आणि वन डे कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतल्या पराभवानंतर त्यानं कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. आशिया चषकात कमबॅक करणार**?** आगामी आशिया चषतकात विराट कोहली भारतीय संघातला महत्वाचा शिलेदार आहे. आशिया चषकातली विराटची आजवरची कामगिरी पाहता तो या स्पर्धेतून पुन्हा कमबॅक करेल अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.