पर्थ, 7 ऑक्टोबर: गेली 15 वर्ष तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचं एक स्वप्न आहे ते म्हणजे भारतानं पुन्हा एकदा टी20 वर्ल्ड कप जिंकावा. महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियानं 2007 साली भारताला पहिलावहिला टी20 वर्ल्ड कप जिंकून दिला. पण त्यानंतर एकदाही वर्ल्ड कपची ती ट्रॉफी भारतीय संघाला उंचावता आली नाही. तीच ट्रॉफी भारतात पुन्हा आणण्यासाठी रोहित शर्मा अँड कंपनी सध्या ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. गुरुवारी पहाटे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आणि आज पहाटे टीम इंडियाचे हे शिलेदार ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये पोहोचले. त्यानंतर भारतीय संघानं पर्थच्या वाका मैदानात या वर्ल्ड कप मोहिमेचा नारळही फोडला. बीसीसीआयनं याचा एक फोटो नुकताच शेअर केला आहे. टीम इंडियाचं ट्रेनिंग सेशन पर्थमध्ये पोहोचल्यानंतर आज टीम इंडिया दुपारच्या सत्रात वाका मैदानात दाखल झाली. इथे टीम इंडियाचं आज पहिलं ट्रेनिंग सेशन पार पडलं. भारतीय संघाच्या विश्वचषक मोहिमेला 23 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांविरुद्ध टीम इंडिया पर्थमध्ये सराव सामने खेळणार आहे. त्यातला पहिला सराव सामना 17 ऑक्टोबरला तर दुसरा 19 ऑक्टोबरला होणार आहे. हेही वाचा - Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मिळाला फ्यूचर कायरन पोलार्ड! वर्ल्ड कपआधी करतोय जोरदार फटकेबाजी, Video 23 ऑक्टोबरला महामुकाबला टीम इंडियाचा वर्ल्ड कप मोहिमेतला सलामीचा सामना होईल तो पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. गेल्या वर्षी याच पाकिस्ताननं वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता. पण यंदा त्याची परतफेड करण्याची संधी टीम इंडियासमोर आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 23 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे जवळपास 1 लाख प्रेक्षक क्षमता असलेल्या एमसीजीवरच्या या सामन्याची सगळी तिकिटं एक महिना आधीच विकली गेली आहेत. त्यामुळे या महामुकाबल्यावेळी मैदानात दोन्ही संघांना चांहत्यांचा चांगलाच पाठिंबा मिळणार आहे.
Hello and welcome to WACA 🏟 #TeamIndia are here for their first training session. pic.twitter.com/U79rpi9u0d
— BCCI (@BCCI) October 7, 2022
बुमराऐवजी कुणाला संधी? दरम्यान टीम इंडिया 15 ऐवजी 14 खेळाडूंसह ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. ऐनवेळेस जसप्रीत बुमराच्या दुखापतीनं उचल खाल्ली आणि वर्ल्ड कप मोहिमेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. त्यामुळे त्याच्याशिवाय भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. बीसीसीआयनं लवकरच 15व्या खेळाडूची घोषणार करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर ही नावं चर्चेत आहेत.