मेलबर्न, 11 नोव्हेंबर: मेलबर्नच्या मैदानात पाकिस्तान आणि इंग्लंड यंदाच्या टी20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी सज्ज झाले आहेत. 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर आयसीसी टी20 वर्ल्ड कपची ही मेगा फायनल पार पडणार आहे. पण त्याआधी क्रिकेट चाहत्यांना निराश करणारी एक बातमी समोर आली आहे. रविवारी 13 नोव्हेंबरऐवजी ही मॅच सोमवारी 14 नोव्हेंबरला होण्याची जास्त शक्यता आहे. आणि याचं कारण आहे मेलबर्नमधलं सध्याचं हवामान. फायनलदिवशी पावसाची शक्यता मेलबर्नमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत इथे खेळवण्यात आलेले वर्ल्ड कपचे तीन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते. त्यात फायनलमध्येही पाऊस बरसण्याची शक्यता असल्यानं चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. फायनलसाठी तब्बल 90 हजार प्रेक्षक एमसीजीवर उपस्थित राहणार आहेत. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी पाऊस पडण्याची शक्यता 95 टक्के इतकी आहे. रविवारी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तर सोमवारी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सोमवारी पाऊस पडल्यास कोण विजेता? दरम्यान मेलबर्नमध्ये राखीव दिवशीही पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. सामन्याचा विजेता ठरवण्यासाठी किमान 10-10 ओव्हर्सचा खेळ होणं गरजेचं आहे. पण जर सोमवारच्या राखीव दिवशीही खेळ झाला नाही तर पाकिस्तान आणि इंग्लंड हे संयुक्त विजेते ठरतील.
2019 वर्ल्ड कपची सेमी फायनल आणि पाऊस 2019 च्या इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपवेळी सेमी फायनलच्या सामन्यात पावसानं असाच व्यत्यय आणला होता. भारत आणि न्यूझीलंड संघातली सेमी फायनल तब्बल दोन दिवस चालली. त्याचा टीम इंडियाला चांगलाच फटका बसला. भारतानं तो सामना गमावला होता. तर 2002 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवेळी दोन्ही दिवस पावसामुळे सामने रद्द करावे लागले आणि संयुक्त विजेत्याची घोषणा करण्यात आली होती. हेही वाचा - T20 World Cup: पराभवानंतर मैदानातच रोहित रडला, पण त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये पाहा काय काय घडलं? दुसऱ्यांदा वर्ल्ड कप कोण जिंकणार? टी20 वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासात केवळ वेस्ट इंडिज हा असा संघ आहे ज्यानं दोन वेळा विजेतेपद पटकावलं आहे. 2012 आणि 2016 साली वेस्ट इंडिजनं वर्ल्ड कप जिंकला होता. पण आता पाकिस्तान आणि इंग्लंडसमोर ती संधी चालून आली आहे. या दोन्ही संघांनी याआधी वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे मेलबर्नच्या मैदानात दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप कोण जिंकणार याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. पण त्यासाठी खेळ होणं गरजेचं आहे.

)







