सिडनी, 09 ऑक्टोबर: यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये अनेक रोमहर्षक लढती पाहायला मिळाल्या. अनेक धक्कादायक क्षण क्रिकेट चाहत्यांनी अनुभवले. पाकिस्तानची सेमी फायनलमध्ये झालेली एन्ट्री तर अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. याचं कारण सुपर 12 फेरीच्या शेवटच्या दिवशी नेदरलँड संघानं केलेली कमाल. नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला आणि त्यानंतक समीकरणं बदलून गेली. दक्षिण आफ्रिका स्पर्धेबाहेर गेल्यानं बांगलादेशला हरवून पाकिस्ताननं सेमी फायनलची दारं उघडली आणि आज फायनलमध्येही धडाक्यात एन्ट्री केली. पण त्यामुळे टीम इंडियाची चिंता मात्र वाढली आहे. कारण पाकिस्तान 1992 च्या वर्ल्ड कपची पुनरावृत्ती करण्याच्या वाटेवर आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात.
1992 आणि 2022 मध्ये साम्य काय? 1992 साली पाकिस्ताननं इम्रान खान यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळचा ग्रुप स्टेजपासून फायनलपर्यंतचा पाकिस्तानचा प्रवास आणि आताचा प्रवास सारखाच आहे.
- 1992 साली ऑस्ट्रेलिया गतविजेती होती… यंदाही ऑस्ट्रेलियाच गतविजेती आहे.
- ऑस्ट्रेलियातच 1992 सालच्या वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं… यंदाचा वर्ल्ड कपही ऑस्ट्रेलियातच आहे.
- 1992 मध्ये यजमान ऑस्ट्रेलिया ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडली होती… यंदाही यजमानांचं आव्हान सुपर 12 मधूनच संपुष्टात आलं.
- 1992 ला ग्रुप स्टेजमध्ये भारतानं पाकिस्तानला हरवलं होतं… यंदा मेलबर्नमध्ये टीम इंडिया पाकवर सरस ठरली.
- 1992 साली सेमी फायनलमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला हरवलं होतं…. सिडनीच्या मैदानात यंदा पाकनं किवींचा धुव्वा उडवला
Pakistan at the 1992 ODI World Cup 🤝 Pakistan at the 2022 T20I World Cup pic.twitter.com/aDvZfN5XTR
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 7, 2022
हेही वाचा - Ind vs Eng: सेमी फायलमध्ये रोहित शर्मा खेळणार की नाही? प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली ‘ही’ मोठी अपडेट मेलबर्नमध्ये काय होणार? 1992 साली पाकिस्ताननं इंग्लंडला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड संघात सेमी फायनल बाकी आहे. ही सेमी फायनल जिंकून इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये फायनल होणार का? पाकिस्तान इंग्लंडला हरवून दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकणार? असे अनेक प्रश्न सध्या यानिमित्तानं उभे राहिले आहेत. पण रोहित शर्माच्या टीम इंडियानं अॅडलेडच्या मैदानात जर इंग्लंडला हरवलं तर ही सगळी समीकरणं बदलणार आहेत. तसं झालं तर मेलबर्नमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान संघात 15 वर्षांनी महामुकाबला पाहायला मिळेल.