मुंबई, 22 डिसेंबर: सय्यद मुश्ताक अली T20 आणि विजय हजारे (Vijay Hazare Trophy 2021) एकदिवसीय सामना मालिकेत मुंबईच्या ढिसाळ कामगिरीबाबत क्रिकेट जगतात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि मुख्य सिलेक्टर दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांना मार्गदर्शक म्हणून घेण्याचा विचार करत आहे.
सीआयसीमध्ये सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी याशिवाय मुंबईचे माजी खेळाडू जतीन परांजपे आणि नीलेश कुलकर्णी यांचा समावेश आहे. संघाच्या खराब कामगिरीसाठी सर्वोच्च परिषदेने तिघांनाही जबाबदार धरले आहे.
दिलीप वेंगसरकर यांनी मुंबई संघाची कामगिरी सुधारण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी, अशी मागणी एमसीएतर्फे केली जाणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीच्या एलिट गट ब मध्ये मुंबई संघ शेवटच्या स्थानावर राहिला. संघात शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालसारखे खेळाडू असूनही त्यांनी 2014 मध्ये फक्त एकच सामना जिंकला होता. सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली आणि एमसीएने मुंबईच्या खराब कामगिरीबद्दल प्रशिक्षक अमोल मजुमदार यांच्याकडून अभिप्राय घेतला, असे संघटनेच्या कार्यकर्त्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या मते, सततच्या पराभावामुळे संघातील खेळाडूंवर मानसिक ताण आला असून त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. तसेच आगामी रणजी करंडकासाठी मुंबई संघाला कोलकात्यात खेळावे लागणार असल्याने तिथे आधी जाऊन सराव सामने खेळावेत.
दिलीप वेंगसरकर यांनी असमर्थता दर्शवल्यास मुंबई क्रिकेटचे नाव उंचावलेल्या अन्य ज्येष्ठ माजी क्रिकेटपटूशी MCA संपर्क साधेल. एमसीएचे खजिनदार जगदीश आचरेकर यांनी अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांना पत्र लिहून आढावा बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार काल, (मंगळवार 21 डिसेंबरला) बैठक आयोजित करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vijay hazare trophy